वाघोली (पुणे) – वाघोली येथील श्री चैतन्य टेक्नो स्कुलच्या अनागोंदी कारभाराबाबत माजी उपसरपंच व भाजप युवा मोर्चाचे संघटक संदीप सातव यांनी गटशिक्षणाधिकारी रामदास वालझाडे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार गटशिक्षणाधिकारी पथकाने चैतन्य टेक्नो स्कुलला भेट देत चौकशी केली. तक्रारीमध्ये नमूद मुद्द्यानुसार खुलासा व अहवाल सीदर करण्याचे आदेश स्कूल व्यवस्थापनास देण्यात आले आहेत.
वाघोली-केसनंद रस्त्यालगतच्या श्री चैतन्य टेक्नो स्कुलने विविध करणे दाखवून अवास्तव वाढविलेले शुल्क, शिक्षक-पालक समिती, परिवहन समित्या, शैक्षणिक शुल्क समिती गठीत न करणे, विद्यार्थी पट सादर न करणे, चाचणी परीक्षा घेतल्या जात नाही, महाराष्ट्र शासनाचे ना हरकत प्रमाणपत्र घेतले नाही, आरटीईचे स्वमान्यता प्रमाणपत्र सादर केले नाही, मासिक सभेस मुख्याध्यापक उपस्थित राहत नाहीत, वार्षिक तपासणी वर्गानुसार करण्यासाठी शिक्षणाधीकारींनी परवानगी दिली नाही, सरल डेटा एन्ट्री मध्ये जाणीवपूर्वक माहिती भरलेली नाही, स्कुलचा मनमानी कारभार चालू असून शिक्षण विभागाच याला खतपाणी घालत आहे का? असा सवाल उपस्थित करून लेखी तक्रार भाजपचे संघटक व वाघोलीचे माजी उपसरपंच संदीप सातव यांनी पुणे जिल्हा परिषदेकडे केली होती. एक महिन्याचा कालावधी होऊनही याकडे लक्ष दिले जात नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यानंतर हवेलीचे गटशिक्षणअधिकारी रामदास वालझाडे, विस्तार अधिकारी ज्ञानदेव खोसे, केंद्रप्रमुख अशोक ससाणे यांच्या पथकाने बुधवारी (दि. 3) चैतन्य टेक्नो स्कुलमध्ये प्रत्यक्ष येऊन चौकशी केली. सातव यांच्या तक्रारीमध्ये नमूद मुद्द्यानुसार खुलासा व अहवाल सादर करण्यास स्कुल व्यवस्थापनास आदेश देण्यात आले आहेत.
श्री चैतन्य टेक्नो स्कुल व्यवस्थापनास अहवाल व कागदपत्रे सादर करण्यास सांगितले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.
– रामदास वालझाडे, गटशिक्षणाधिकारी
श्री चैतन्य स्कूलने वेगवेगळ्या कारणाने पालक शिक्षण समिती नसताना फी जमा केली आहे. याबाबत आज समितीने स्कूलची पूर्णपणे चौकशी केली आहे. वाघोली मधील इतर स्कूलने अशाप्रकारे पालकांना वेठीस धरून फी जमा केली असेल तर स्कूल प्रशासनाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करून कारवाई करण्यात येणार आहे.
– संदीप सातव, माजी उपसरपंच, ग्रामपंचायत वाघोली