जालना : समर्थ रामदासांचे जन्मगाव असणारे ‘जांब समर्थ’ येथील राम मंदिरातून ऐतिहासिक मूर्ती चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माहितीनुसार मंदिरातून 450 वर्षापूर्वीच्या मूर्ती चोरीला गेल्या आहेत. अज्ञात चोरट्यांकडून मंदिरातील ऐतिहासिक दुर्मिळ पंचधातूंच्या मुर्त्या चोरी करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.
समर्थ रामदासांनी स्थापित केलेली राम लक्ष्मण सीतेची मूर्ती देखील चोरीला गेली आहे. तसेच ऐतिहासिक पंचायतन (राम लक्ष्मण सीता, भरत, शत्रूघ्न) देखील चोरीला गेले आहे.समर्थ झोळीत ठेवत असलेली तसेच दंडात बांधत असलेल्या मारोतीच्या मुर्त्या देखील चोरीला गेल्या आहेत.
घटनेची माहिती कळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी रात्री 3 च्या सुमारास चोरी झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. पाळत ठेऊन मंदिरातील चावी घेऊन चोरी केल्याचे समोर आले आहे. दरम्यान या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची पोलिस कसून चौकशी करत आहेत.
तर दुसरीकडे आज विधानसभेत आमदार राजेश टोपे यांनी या चोरीचा मुद्दा उपस्थित करत म्हणाले की, पहाटे तीन वाजता चोरट्यांनी जांब समर्थ येथील मंदिरातील मुर्त्या चोरल्या आहेत. या घटनेमुळं जनमाणसात रोष आहे. समर्थ रामदासांच्या जन्मगावी ‘जांब समर्थ’ येथील राम मंदिरात महाराष्ट्रभरातून भाविक येत असतात. राज्य सरकारनं या स्थळाला ब दर्जाच्या तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केलं आहे. या ऐतिहासिक मंदिरात राज्यभरातून भाविक येत असतात. या प्रकऱणाची गांभीर्यानं नोंद घेऊन कारवाई करावी, अशी मागणी राजेश टोपे यांनी विधानसभेत केली.
जांब समर्थ हे समर्थ रामदास स्वामींचं जन्मगाव आहे. हे ठिकाण जालना जिल्हयातील घनसावंगी तालुक्यामध्ये आहे. हे राम मंदिर रामदास स्वामी यांच्या घरामध्ये स्थित आहे. समर्थ मंदिर हे संत रामदास स्वामी यांच्या आठवणीमध्ये बनविण्यात आले आहे. एका संस्थेमार्फत या मंदिराचे व्यवस्थापन पाहिले जाते.