मुंबई – राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. गोकुळाष्टमी आणि रविवारच्या सुट्टीनंतर आज अधिवेशनाला पुन्हा एकदा सुरुवात झाली. पहिल्या दिवसाप्रमाणे आजही विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकार विरोधात सभागृहाच्या पायऱ्यांवर बसून जोरदार घोषणाबाजी केली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी केलेली ‘५० खोके एकदम ओके’ची घोषणाबाजी लक्षवेधी ठरली होती.
शिंदे फडणवीस सरकारविरोधात आजही विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे यावेळी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेस अशा तिन्हही पक्षांनी एकजुटीत जोरदार घोषणाबाजी केल्याचे दिसून आले. ईडी सरकार हायहायच्या जोरदार घोषणाही यावेळी विरोधकांनी दिल्या. अनेकांनी, ‘करून महाराष्ट्राशी गद्दारी सत्तेत आली शिंदेंची स्वारी’, ‘ईडी ज्यांच्या घरी तो भाजपच्या दारी’,’ओला दुष्काळ जाहीर करावा अतिवृष्टीग्रस्तांना मदत करावी’ अशा आशयाचे फलक हाती घेतल्याचे देखील दिसून आले.
सुनावणी लांबणीवर
अधिवेशनप्रमाणेच राज्यसह अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या शिवसेना आणि शिंदे गटातील सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर आज म्हणजेच २२ ऑगस्टरोजी सुनावणी होणार होती. मात्र या संदर्भातील एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. शिवसेना पक्ष नेमका कोणाचा याच चित्र या सुनावणीनंतर स्पष्ट होणार आहे. परंतु तूर्तास ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असल्याचे समोर आले आहे. पुढील सुनावणी उद्या म्हणजेच २३ ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.