हिंगोली – हिंगोली जिल्ह्यातील 531 वर्षाची ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या सारंग स्वामी यात्रेला सुरूवात झाली आहे. दरम्यान, या यात्रेच्या प्रसादाचे महत्त्व सर्वदूर पोहचले असून भाजीचा प्रसाद घेण्यासाठी हजारो भाविक-भक्त येथे येत असल्याचे पाहायला मिळत आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील “शिरडशहापूर येथे सुरू असलेल्या यात्रेत भाजीच्या प्रसादासाठी हजारों भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
हिंगोलीतील शिरडशहापूर येथे विरशैव बांधवांचे आराध्य दैवत म्हणून सारंग स्वामी महाराजांना ओळखले जाते. येथे अनेक वषार्पासून दरवर्षी मकरसंक्रांतीपासून यात्रा महोत्सव सुरू होते. या सारंग स्वामी यात्रेत 160 क्विंटल भाजीचा प्रसाद करण्यात आला होता. या यात्रेत भाजीच्या प्रसादाचे विशेष महत्त्व आहे. यात्रेत आलेल्या भाविकांनी सोबत पोळ्या घेऊन आले होते.
या ठिकाणी तयार केलेल्या भाजीचा प्रसाद घेऊन भोजन केले. तसेच अनेक भाविक भाजीचा प्रसाद घरी घेऊन गेले. यात टोमॅटो, वांगी, चवळी, दोडके, पालक, शेपू, मेथी, करडी, पानकोबी, फुलकोबी, हिरवी मिरची, सिमला मिरची, गांजर काकडी, मुळा, कांदे, ऊस आदी प्रकारच्या 160 क्विंटल भाज्याचा प्रसाद तयार करण्यात आला. ही भाजी प्रसादाचे भाविकांना नंतर वाटप करण्यात आले. यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येने आले होते.
या यात्रेत विविध धार्मिक वस्तू विक्रीचे दुकाने उभारण्यात आले होते. वीरशैव समाज बांधव शिरडशहापुर, सारंगवाडी, गवळेवाडी आदी गावातील ग्रामस्थांनी भाजीच्या प्रसादासाठी पुढाकार घेतला. भाजीप्रसाद यात्रेसाठी परभणी, नांदेड, हिंगोली, औरंगाबाद, जालना जिल्ह्यासह आंध्रप्रदेश कर्नाटक व मराठवाड्यातील भाविक भाजीच्या प्रसादासाठी हजारोच्या संख्येने दाखल झाले.
शिरड शहापूर परिसरातील डोंगराळ भागात असलेल्या सारंगवाडी येथे संतश्रेष्ठ सारंग स्वामी यांच्या महाराज वार्षिक यात्रेनिमित्त आज ‘भाजी’ महाप्रसाद वाटप होणार आहे. या निमित्ताने गावोगावच्या दिंड्या दाखल झाल्या असून विविध धार्मिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.
सकाळी नऊ वाजता भाजी प्रसाद वाटप सुरु…
16 जानेवारी रोजी रात्री भाज्या घेऊन अनेक भाविक दाखल झाले होते. रात्रीपासून भाजी प्रसाद तयार करण्यासाठी सुरुवात करण्यात आली होती. 17 जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता भाजी प्रसाद वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली. भाजीचा प्रसाद भाविकांना व्यवस्थितरित्या मिळावा म्हणून मंदिर व्यवस्थापन समितीने ठिकठिकाणी व्यवस्था केली होती. प्रत्येक भाविकाला भाजीचा प्रसाद मिळावा म्हणून स्वयंसेवक उभे करण्यात आले होते.
यात्रेच्या निमित्ताने चोख पोलिस बंदोबस्त
जिल्ह्यासह परजिल्ह्यांतील भाविक सारंगस्वामी महाराजांच्या दर्शनासाठी येतात. कुठलाही अनुचित प्रकारे घडू नये म्हणून यात्रेत पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.