नवी दिल्ली – दिल्ली विमानतळावर धुक्याच्या समस्येमुळे विमान सेवा विस्कळीत होण्याचा प्रकार ही मोदी सरकार निर्मित आपत्ती असल्याची टीका कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी केली आहे. आणि त्यासाठी त्यांनी तंत्रशुद्ध कारणमिमांसाही केली आहे. मात्र त्यांच्या टिकेची नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी खिल्ली उडवली आहे.
दिल्ली विमानतळावरील अनागोंदी हा नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या “दुर्लक्ष आणि अक्षमतेचा” परिणाम असल्याचा आरोप थरूर यांनी एक्स वरील सहा पोस्टच्या मालिकेमध्ये केला आहे. थरूर यांनी आरोप केला की भारताचे विमान वाहतूक क्षेत्र खेदजनक स्थितीत आहे. इतर भारतीय शहरांमधील विमानतळे इतकी जागतिक दर्जाची आहेत की शून्य दृश्यमानतेतही विमाने तेथे उतरू शकतात. पण त्याचा योग्य वापर करण्यास विमान मंत्रालय सक्षम नाही.
हिवाळ्याच्या महिन्यांत प्रशिक्षित वैमानिक तैनात केले जातील, जे कमी दृश्यमानतेत उतरू शकतील याचीही मंत्रालयाने खात्री केली नाही, असा दावा त्यांनी केला. धुक्यामुळे वारंवार विमान वाहतूक विस्कळीत होत असून त्यामुळे हजारो विमान प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हजारो लोकांचे जीवन आणि वेळापत्रक धुक्याच्या थंडीच्या दिवसामुळे विस्कळीत झाले आहे. ही मोदी सरकारने बनवलेली आपत्ती आहे, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या दुर्लक्ष आणि अक्षमतेचा परिणाम आहे, असेही थरूर यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
हा मुद्दा स्पष्ट करताना थरूर म्हणाले की दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळाला एक नवीन सीएटी ३ आयआय बी श्रेणी अनुरूप धावपट्टी मिळाली आहे, ही एक प्रगत लँडिंग सिस्टम आहे जी धुके असताना किंवा दृश्यमानता 50 मीटर इतकी कमी असतानाही पायलटला लँडिंग करू देते. २००८ मध्ये एक हजार कोटी रूपये खर्च करून ही व्यवस्था उभारण्यात आली आहे. पण त्याचा योग्य वापर करण्यास मोदी सरकार सक्षम नाही.
दिल्लीला चार धावपट्ट्या आहेत, त्यापैकी दोन सीएटी ३ बी अनुरूप आहेत. आपल्या सर्व शहाणपणाने, मोदी सरकारने सप्टेंबर २०२३ मध्ये यातील दोन धावपट्ट्यांपैकी एकाच्या देखभालीचे काम सुरू केले, हिवाळा व धुक्याची समस्या जवळ आली आहे याची जाणिव असतानाही हे काम प्रलंबित ठेवले गेले.
त्याहून वाईट म्हणजे, दुरूस्ती पूर्ण झाल्यानंतरही, काही इतर बांधकाम कामाच्या क्रेनमुळे यातील एका धावपट्टीचे कार्य रोखले गेले. या बाबत दिल्ली विमानतळाने १० दिवसांपूर्वी, ५ जानेवारी रोजी ही बाब निदर्शनाला आणूनही त्याकडे लक्ष दिले गेले नाही. रनवे व्यतिरिक्त, वैमानिकांना सीएटी ३ बी धावपट्टीवर उतरण्यासाठी प्रशिक्षित केले पाहिजे. परंतु अजूनही नागरी उड्डाण मंत्रालयाने त्याकडे लक्ष दिले नाही.
त्यामुळे जयपूर आणि अहमदाबाद सारख्या शहरांकडे अनेक उड्डाणे वळवण्यात आली, त्याचा प्रवाशांना मोठा मनस्ताप झाला असे थरूर यांनी निदर्शनाला आणून दिले. मात्र विमान वाहतूक मंत्रालयाने याचा इन्कार केला आणि थरूर यांचा आरोप खोडण्याचा प्रयत्न केला. धावपट्टीच्या दुरूस्तीचे काम प्रदुषणामुळे लांबणीवर पडल्याचा मासलेवाईक दावाही त्यांनी केला आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटले आहे की, धावपट्टीवरील क्रेनचा उपयोग द्वारका एक्सप्रेसवे या आणखी एका महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या बांधकामासाठी केला जात आहे.पण त्यामुळे यापुढे विमान वाहतुकीवर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.