मुंबई – राजकीय आरोप-प्रत्यारोपामध्ये अडकलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावोस दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत चार लाख कोटी रुपयांचे विविध सामंजस्य करार केले असल्याची माहिती त्यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतून दिली आहे.
मीडियाशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, काल आणि आज मोठ्या प्रमाणात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. आमची 3 लाख कोटी रुपयापर्यंतची अपेक्षा होती. परंतु आतापर्यंत जवळपास 4 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत.
महाराष्ट्राला उद्योजक पसंती देत आहेत. कारण, औद्योगिकरणासाठी महाराष्ट्रासारखी दुसरी सुपिक जमीन कुठे नाही. महाराष्ट्र शासनाची उद्योगाबाबतची पॉलिसी ही लवकचिक आहे. आमचे सगळी लोक सहकार्य करणारे लोक आहेत. औद्योगिकरणासाठी महाराष्ट्र सगळ्या उद्योजकांना रेड कार्पेट आंथरून उभा आहे. म्हणून उद्योजकांचा विश्वास वाढीस लागला आहे.
एकूण महाराष्ट्र आणि केंद्र सरकारमध्ये एक समन्वय आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील डबल इंजिन सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे. त्यामुळेच मागील दीड वर्षात अनेक क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. यामुळेच संपूर्ण जगात महाराष्ट्राला मान मिळत असल्याची प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.
असे करण्यात आले करार
दावोस दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बुधवारी लॉयड मेटल्स कंपनीने महाराष्ट्रासमवेत 39 हजार 200 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार केला. महाराष्ट्राच्या दृष्टीने हा महत्त्वाचा करार असून या प्रकल्पातून 11 हजार 800 रोजगार निर्मिती होणार आहे.
बेल्जियम येथील एबीआयएन बेव्ह ही बहुराष्ट्रीय कंपनी महाराष्ट्रात 600 कोटी रुपये (73 दशलक्ष डॉलर) ची गुंतवणुक करणार असून या सामंजस्य करारावर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली. यामुळे राज्यात शेकडो रोजगार निर्माण होण्यास मदत होणार असून महाराष्ट्रात उत्पादन क्षमता वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.