कोपरगाव (प्रतिनिधी) : जनतेवर कोणतेही संकट आले तरी सर्वात अगोदर संजीवनी उद्योग समुह मदतीसाठी एक पाऊल पुढे असते, असे मत माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केले.
करोना विषाणूंचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोपरगाव शहरातील सर्व रस्त्यावर सोडियम हाइपो क्लोराईड जंतुनाशक फवारणी सुरू करण्यात आली.
करोना विषाणूजन्य संसर्गामुळे देशासह राज्यात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. या विषाणूपासुन कोपरगावच्या नागरीकांचा बचाव करण्यासाठी संजीवनी उद्योग समुह व संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने सोमवारी सकाळी औषध फवारणी करण्यात आली. माजी आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, उपनगराध्यक्ष योगेश बागुल, आरोग्य विभागाचे सभापती अनिल आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत औषध फवारणीचा शुभारंभ झाला.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की, करोनाचा मुकाबला करण्यासाठी जनतेने शासनाच्या आवाहनाला साथ देऊन स्वताःसह परिवाराची गांभिर्याने काळजी घेणे गरजेचे आहे. आपण नेहमी म्हणतो, भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. तर मग आता देश करोनामुळे संकटात आहे. करोनाचा सामना करण्यासाठी व त्याचा संसर्ग वाढू नये म्हणुन सामुदायिक ठिकाणी गर्दी न करता घरात बसुन देश प्रेम दाखवण्याची वेळ आली आहे. हे करोनाचे संकट गंभीर असले तरी त्याला खंबीरपणे लढा द्यायचा आहे. आता शहरात औषध फवारणी करुन स्वच्छता करण्याचे कम संजीवनीच्या माध्यमातून सुरू आहे. हा पहिला कारखाना आहे की आपत्ती व्यवस्थापनाचे स्वतंत्र पथक सज्ज केले आहे तेव्हा नागरीकांनी घाबरुन जावू नये, असे आवाहन स्नेहलता कोल्हे यांनी केले.
यावेळी बिपीन कोल्हे म्हणाले की, नागरीकांनी करोनाचे गांभीर्य घेतले पाहिजे. योग्य ती खबरदारीत श्रध्दा ठेवून सबुरीने पुढील काळापर्यंत जपले पाहीजे. संजीवनी उद्योग समुहाने करोनापासुन बचाव करण्यासाठी गेल्या दहा दिवसापासून आधुनिक पध्दतीने नियोजन केले आहे. त्याचा पहिला भाग म्हणुन शहरातील रस्त्यावर योग्य त्या औषधांची फवारणी करुन निर्जंतुक रस्ते करीत आहोत. येत्या काळात जी मदत लागेल ती प्रशासनासह नागरीकांना पुरविण्याची तयारी बिपीन कोल्हे यांनी दर्शवली आहे.
संजीवनी आपत्ती व्यवस्थापन पथक व संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने नागरीकांमध्ये जनजागृती करून फोगर मशीनच्या सहाय्याने जंतुनाशक फवारणी करण्यात आली. माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी समाजकार्याचा वसा दिला असून त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत हा उपक्रम हाती घेतला आहे. शहरातील साईबाबा तपोभूमी पासुन या फवारणीला सुरूवात करण्यात आली.
स्नेहलता कोल्हे, बिपीन कोल्हे यांनी स्वतः धुरफवारणी करून रस्ता स्वच्छ केले. संकट काळी मुख्य रस्त्यासह अनेक रस्त्यावर औषध फवारणी करुन कोल्हे परिवाराने माणूसकीचे दर्शन घडविले. यावेळी शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष कैलास जाधव, भाजपचे शहराध्यक्ष कैलास खैरे, गटनेते रवींद्र पाठक, नगरसेवक स्वप्निल निखाडे, माजी नगरसेवक बबलु वाणी, विनोद राक्षे, यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते एका विशिष्ट अंतराने उभे राहुन उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमासाठी आलेल्या प्रत्येकांचे हात स्वच्छ करुन मास्कचे वाटप करुन विषेश दक्षता घेण्यात आली होती.