जनजीवन ठप्प; जीवित हानी नाही
शिरवळ – खंडाळा तालुक्यात गेले एकवीस दिवसापासून संततधार पाऊस सुरू असल्याने आजअखेर 1677.2 मिलीमीटर इतका पाऊस झाला असून पश्चिम भागातील ओढे,नाले तुडूंब भरून वाहत आहेत. पावसामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. तसेच पळशी (ता. खंडाळा) येथे पाच घरांची पडझड झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवने कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याची माहिती खंडाळ्याचे तहसीलदार दशरथ काळे यांनी दिली.
खंडाळा तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. मान्सून सुरू होऊन दोन महिने झाले तरी पाऊस नसल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला होता. परंतु गेले एकवीस दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने आजअखेर खंडाळा सर्कलमध्ये 472.6 मिमी, शिरवळ सर्कलमध्ये 658.6 मिमी, लोणंद सर्कलमध्ये 221 मिमी तर वाठार सर्कलमध्ये 325 मिमी असा सुमारे तालुक्यात 1677.2 मिमी इतका पाऊस झाला आहे.
पावसामुळे ओढे, नाले, धरणे, पाझर तलाव तुडूंब भरून वाहत असल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. विंग भागात डोंगर उतारावरून पाणी वाहत येत असून भोर-शिरवळ रस्त्यावरून वाहत आहे. तर निरा देवघर व भाटघर धरणे तुंडूब भरल्याने नीरा नदीला पूर आल्याने हरतळी (ता. खंडाळा) जवळील पुलावरून सुरक्षिततेसाठी भोर – पुणे मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच पळशी (ता. खंडाळा) येथे अशोक शिवराम गोळे, रामचंद्र बापूजी भरगुडे, दिनकर श्रीपती भरगुडे, गणपती श्रीपती भरगुडे व हनुमंत हरिभाऊ राऊत यांच्या घरांची पडझड झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.