मुंबई – राज्यभरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बीड, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर, अमरावतीसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दमदार बॅटिंग केली असल्याने शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच राज्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा झाला आहे.
सध्या राज्यातील मोठी धरणं 36 टक्के भरली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या धरणात सध्या 10 टक्के जास्त पाणीसाठा आहे. मध्यम धरणांमध्ये 32 टक्के आणि लघू धरणांमध्ये 14 टक्के पाणीसाठा आहे. राज्यातील सर्व धरणं मिळून सध्या 32 टक्के पाणीसाठा आहे. कोकण विभागातील धरणं निम्मी भरली आहेत, तर नागपूर विभागातील धरणांमध्येही 44 टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे.
मागील 22 तासांमध्ये मुंबईत अतिमुसळधार पावसाची नोंद झाली. अद्यापही पावसाचा जोर कायम आहे. किंग्ज सर्कल येथे गुडघ्यापर्यंत पाणी साचले आहे. त्यामुळे हा परिसर जलमय झाला असून येथे गाड्या बंद पडत आहेत, लोकांचे हाल होताना दिसत आहे, बसेस वेळेवर येत नाहीत. ठाण्यातही कालपासून (15 जुलै) रिमझिम पाऊस पडत आहे. आजदेखील ढगाळ वातावरण असून हवेत गारवा जाणवत आहे. शहरातील जवळपास 5 ठिकाणी झाडे आणि फांद्या कोलमडून पडले. त्यामुळे कोणतीही हानी झालेली नाही.
पुढच्या 24 तासांमध्ये मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि अन्य काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. घाट परिसरात, कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मच्छीमारांसाठी इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टीच्या भागामध्ये जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.