मुंबई – राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीच हे सरकार कौरवांचं सरकार आहे. कौरवांना ज्याप्रमाणे कुठलीही नितीमत्ता नव्हती, यांनाही कुठलीच नितीमत्ता नाही. कौरावांचं राज्य जाईल आणि लवकरच पांडवांचं राज्य येईल, अशा कठोर शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली.
मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नारायण राणेंनी शिवसेनेवरही टीकास्त्र सोडले. भाजपसोबत युती करुन निवडून यायचं आणि संसार कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत थाटायचा, ही बेईमानी आहे. शिवसेनेच्या मुखपत्रात दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी शिवसेनेमुळे भाजपचे 105 आमदार आले, असे केलेले वक्तव्य कुणालाही पटणारं नाही, असेही राणे म्हणाले.
शिवसेनेच्या मुखत्रातून आतापर्यंत शरद पवारांविरोधात बातम्या येत असताना आता त्यांची मुलाखत घेतली जात आहे. शरद पवार यांच्या मुलाखतीतून राज्याला करोनावर मात करण्यासाठी उपाययोजना सांगितल्या असत्या तर बरं झाले असते. शरद पवार यांची मॅरेथॉन मुलाखत हेच मुळात राजकारण आहे, असा टोलाही त्यांनी लगाविला.