चंद्रपूर – राज्यासह देशभरात उन्हाळा सुरु झाला असून तापमानात कमालीची वाढ झाली आहे. देशभरातील अनेक शहरांमध्ये उन्हाच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे. राज्यात विदर्भ मराठवाड्यात तापमानातस र्वाधिक वाढ झाली आहे. या भागात उन्हामुळे नागरिकांना घराबाहेर पडले अवघड झाले आहे. अनेक ठिकाणी उष्णतेचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. असे असताना विदर्भातील चंद्रपूर शहराचा जगातील सर्वात उष्ण शहरांमध्ये समावेश झाला आहे. या शहरातील तापमान 43.4 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.
जगातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये चंद्रपूर हे शहर तिसऱ्या क्रमांकावर असल्याची नोंद झाली आहे. पृथ्वीतलावरील सर्वाधिक उष्ण शहरामध्ये पहिल्या क्रंमाकावर मालीतील कायेस शहर आहे. या शहराचा तापमानाचा पारा 44.4 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. तर दुसऱ्या क्रमांकावर मालीतील सेगोऊ शहर आहे. येथील तापमानाची 43.8 अंश इतकी नोंद झाली आहे.
दरम्यान, सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत पहिल्या दहा शहरांमध्ये भारतातील चार शहरांचा समावेश आहे. या यादीत विदर्भातील अकोला हे शहर सातव्या क्रमांकावर असून मंगळवारी येथील तापमान 43.1 अंश सेल्सिअस एवढं नोंदलं आहे. तर भारतातील पिलानी आणि चुरू ही शहरं अनुक्रमे 43.1 अंश सेल्सिअस आणि 43.0 अंश सेल्सिअससह आठव्या आणि नवव्या स्थानावर आहेत. शिवाय या शहरातील तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.