नवी दिल्ली – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार हा प्रश्न मंगळवारीही अधांतरीच राहिला आहे. या प्रकरणावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती.
पण हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजासाठी पटलावरंच आले नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या सुनावणीसाठी आता नवीन तारीख मिळण्याची शक्यता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतचे प्रकरण सुप्रीम कोर्टात सुनावणीसाठी आठव्या क्रमांकावर होते. पण ते कामकाजासाठीच आले नाही. त्यामुळे आता याची सुनावणी पुढे ढकलली गेल्याचे स्पष्ट झाले.
मुंबई पुण्यासह राज्यातील 25 पेक्षा अधिक महापालिका, 207 नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचं भवितव्य या सुनावणीवर अवलंबून आहे. गेल्या काही महिन्यांपासून या निवडणुकांबाबत सातत्याने तारीख पे तारीख असेच चित्र पाहायला मिळत आहे, पण कोणतंही कामकाज होताना दिसत नाही.