पाकिस्तानात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेवर मात होण्याऐवजी तेथील संसदच आता बरखास्त करण्यात आल्याने तेथील अस्थिरतेत भरच पडली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी राजकीय खेळ्या करून स्वत:च्या सरकारचे बहुमत गमावूनसुद्धा विरोधकांच्या हाती सत्ता लागू दिली नाही आणि त्यांनी संसदच बरखास्त करून देशात मध्यावधी निवडणुकांची शिफारस राष्ट्राध्यक्षांना केली आहे. त्यामुळे पाकिस्तानात आता नवीन निवडणुकांच्या धामधुमीला सुरुवात होणार आहे.
इम्रान खान हे नवखे राजकारणी आहेत, अशी काहीजणांनी सुरुवातीपासून धारणा करून घेतली होती; पण इम्रान खान यांनी ज्या मुरब्बी राजकीय खेळ्या केल्या आणि विरोधकांची डाळ शिजायच्या आधीच त्यांचा जो डाव उधळून लावला आहे त्यातून त्यांना आता कोणी नवखे राजकारणी म्हणणार नाही. इम्रान खान हे नेतृत्व अन्य पारंपरिक पाकिस्तानी नेतृत्वापेक्षा वेगळे होते. ते टिपीकल इस्लामिक परंपरेतील नेतृत्व नव्हते. त्यांच्यात आधुनिकतेचा विचार होता, पाकिस्तानला धार्मिक जोखडातून बाहेर काढून प्रगतीच्या मार्गावर नेण्याची त्यांची तळमळ होती. त्यातून पाकिस्तान वेगळ्या दिशेने जाईल असे वाटले होते. पण लष्कर आणि धर्मांध नेत्यांच्या कुटिल कारस्थानामुळे त्यांना आपले इप्सित फारसे काही साध्य करता आले नाही. त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच त्यांना तेथील राजकीय व्यवस्थेने एकटे पाडण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना बऱ्याच अंशी यश आलेही; पण शेवटी त्यातून नुकसान पाकिस्तानचेच झाले आहे.
आज पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत खालावली आहे. लोकांच्या मूलभूत समस्या सोडवणे तर दूरच; पण देशाचा आर्थिक डोलारा सांभाळणेही त्या देशाला अवघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात राजकीय स्थिरता असणे अत्यंत गरजेचे होते. पण इम्रान खान यांना सत्तेवरून घालवण्याच्या संकल्पनेने पछाडलेल्या विरोधकांनी राजकीय अस्थिरता निर्माण करून आपल्याच देशाचे भवितव्य आणखी धोक्यात आणले आहे. राजकीय कुरघोड्या करून सरकार पाडण्याचे आणि सत्ता बळकावण्याचे तेथील विरोधी पक्षांचे कारस्थान त्या देशाला परवडणारे नव्हतेच, पण ही बाब कोणीही ध्यानात घेतली नाही. त्याची परिणती तेथील नॅशनल असेंब्ली बरखास्त होण्यात झाली आहे. आता 90 दिवसांच्या आत तेथे निवडणुका घ्याव्या लागतील आणि त्यानंतर तेथे नवीन सरकार सत्तेवर येईल. पण त्यांच्यापुढचा मार्गही आजच्यापेक्षा खडतर असणार आहे.
भारताच्या दृष्टीने या घडामोडींचा विचार केला तर अस्वस्थ आणि अस्थिर पाकिस्तान भारतालाही परवडणारा नाही. कारण तेथील मध्यवर्ती सरकार जर कमजोर झाले तर तेथील लष्कर आणि त्यांच्या पाठिंब्यावर माकडउड्या मारणारे भारत विरोधी घटक अधिक सक्रिय होतात आणि त्यांना अधिक बळ मिळते. त्याचा त्रास भारतालाच सोसावा लागतो. त्यामुळे पाकिस्तान राजकीयदृष्ट्या स्थिर राहणे अंतिमत: भारताच्याच फायद्याचे होते. इम्रान खान यांचे सत्तेवरून पायउतार होणे त्यामुळेच भारतासाठी नुकसानकारच ठरणार आहे, कारण यापुढे तेथे सत्तेवर येणारे नेतृत्व त्यांच्या इतके प्रॅक्टिकल असण्याची शक्यता कितपत आहे याची चिंता आहे. पाकिस्तानच्या राजकारणात भारतद्वेष हा मूलभूत आधार मानला जातो. त्यामुळे पाकिस्तानातील परिस्थिती जितकी खराब होत जाते तितकी त्यांच्यातील भारत द्वेषाची मात्रा वाढत जाते, असा अनुभव आपण मागेच घेतला आहे.
इम्रान खान यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारताच्या विरोधीच भूमिका सातत्याने मांडली असली, तरी भारतद्वेष हेच त्यांच्या राजकारणाचे एकमेव सूत्र नव्हते. त्यांना भारताच्या विरोधात कारवाया करून पाकिस्तानात लोकप्रियता मिळवणे हे मान्य नसावे, असे दिसून आले होते. त्यामुळे इम्रान खान यांचे नेतृत्व भारतासाठी दगडापेक्षा वीट मऊ अशा स्वरूपाचे होते. पाकिस्तानातील धार्मिक कट्टरवाद्यांना त्यांनी फार प्रोत्साहन दिले नव्हते, ही बाबही भारतासाठी महत्त्वाची होती. इम्रान खान यांना निवडणुका होईपर्यंत काळजीवाहू पंतप्रधान राहता येईल, अशी त्यांची स्वत:ची अटकळ होती. त्यासाठीच त्यांनी अविश्वास ठराव मांडू न देता किंवा त्यावर मतदानच होऊ न देता संसद बरखास्त केली. त्याद्वारे आपल्याला काळजीवाहू पंतप्रधान म्हणून राहता येईल, असा इम्रान खान यांचा प्रयत्न होता. पण त्यांच्या या प्रयत्नांना तेथील ब्युरोक्रॅसिने कोलदांडा घातला आहे.
इम्रान हे आता देशाचे पंतप्रधान राहिलेले नाहीत, असे उच्चपदस्थ अधिकारी सांगत आहेत. सध्या इम्रान काळजीवाहू पंतप्रधान असले तरी ही स्थितीही आता लष्कराला हस्तक्षेपाचा वाव देणारी ठरू शकते. ही बाब भारतासाठी अधिक धोकादायक ठरू शकते. या आधीचे पाकिस्तानचे लष्करी हुकूमशहा परवेझ मुशर्रफ हे भारतासाठी त्रासदायकच ठरले होते. त्यांनी कारगीलमध्ये केलेला उपद्व्याप अजून स्मृतीमध्ये ताजा आहे. त्यामुळे आज जर पुन्हा तेथे लष्कराने सत्ता ताब्यात घेतली, तर पुन्हा तशाच स्वरूपाचा उपद्व्याप आपल्याला उद्भवण्याचा धोका नजरेआड करता येणार नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेले अनेक वर्षे सीमेवर जवानांच्या चकमकी आपण अनुभवल्या होत्या. पण अलीकडच्या काळात मात्र या चकमकी बऱ्याच अंशी थांबल्या आहेत.
काही जण असे सांगतात की, सौदी अरेबियाच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या नेतृत्वाने सीमेवरील शांततेचा गुप्त करार केला आहे. त्यामुळे या चकमकी थांबल्या आहेत. पण यावर अधिकृत पातळीवरून फारसे भाष्य झालेले नाही. कारण काहीही असले तरी दोन्ही देशांच्या जवानांमधील चकमकी थांबल्या होत्या ही वस्तुस्थिती मान्यच करावी लागेल आणि या कामी इम्रान खान यांनी दिलेले सहकार्य भारताच्या पथ्यावरच पडणारे ठरले होते. पण नवीन घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सीमेवरील चकमकींना पुन्हा सुरुवात होईल का, याचीही चिंता आपल्याला करावी लागेल आणि त्या अनुषंगाने आपल्याला सीमेवर सिद्धता ठेवावीच लागेल. भारत सरकार त्या बाबतीत अधिक सजग भूमिका घेईल असा देशवासीयांचा विश्वास आहे. शेजारील श्रीलंका आर्थिक दिवाळखोरीत गेला आहे आणि आता पाकिस्तान राजकीयदृष्ट्या अस्थिर बनला आहे. त्याची झळ भारताला बसता कामा नये एवढीच या संबंधात आपल्या सगळ्यांची अपेक्षा असणार आहे.