रायपूर –छत्तीसगड हे राज्य रोजगाराच्या बाबतीत अत्यंत प्रगतीपथावर असलेले राज्य ठरले असून या राज्याचा बरोजगारीचा दर हा देशातील सर्वात कमी असल्याचे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीत दिसून आले आहे.
छत्तीसगडमध्ये या मार्चमध्ये बेरोजगारीचा दर केवळ 0.6 टक्के नोंदवला गेला आहे, जो आतापर्यंतचा सर्वात कमी दर मानला जात आहे. राज्य सरकारनेही या अहवालाची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, राज्यात रोजगार निर्मितीसाठी सरकारने अनेक पावले उचलली आणि तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी नवीन धोरणे तयार केली, परिणामी बेरोजगारीचा दर सतत घसरत आहे असे राज्य सरकारने म्हटले आहे.
छत्तीसगड सरकारने तीन वर्षांपूर्वी महात्मा गांधींच्या ‘ग्रामस्वराज’ संकल्पनेच्या अनुषंगाने विकासाचे नवे मॉडेल स्वीकारले आणि सुराजी गाव योजना, नारवा-गरवा-घुरवा-बारी कार्यक्रम, गोधन न्याय योजना यासह विविध योजना सुरू केल्या.
ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी राजीव गांधी किसान न्याय योजना या सरकारने राबवली. परिणामी राज्यातील बेरोजगारी जवळपास शून्य टक्क्यांवर आली आहे. पुढील पाच वर्षांत सुमारे 15 लाख नवीन रोजगार संधी निर्माण करण्यासाठी “छत्तीसगड रोजगार मिशन’ची स्थापना केली आहे.