मुंबई – विधानपरिषदेच्या 12 सदस्यांची नियुक्ती करण्याची प्रक्रीया वर्षभरापासून प्रलंबीत आहे. या सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी त्यांच्यावर कोणी दबाव आणत आहे का? हे त्यांनी स्पष्ट करावे. राज्यपालांवर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दबाव असल्यामुळेच त्यांनी या 12 आमदरांची अद्याप नियुक्ती केलेली नाही, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रावर राज्यपालांनी नाराजी व्यक्त करत माझ्यावर कोणी दबाव आणू शकत नाही, असे म्हटले आहे. त्यावर संजय राऊत यांनी केंद्रावर निशाणा साधला.
संजय राऊत म्हणाले, वर्षभरापासून 12 आमदारांची नियुक्ती प्रलंबीत आहे. शिवाय विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्य सरकारकडून अनेक वेळा राज्यपालांना विनंती करण्यात आली. परंतु, त्यांच्याकडून या निवडणुकीवर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना विनंतीसाठी पत्र लिहिले. या पत्रातील भाषेवर नाराज होत माझ्यार कोण दबाव आणू शकत नाही, असे राज्यपालांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राच्या राज्यपालांवर दबाव आणून कामे करून घेणे राज्य सरकराला मान्य नाही. केंद्राकडून राज्यपालांवर दबाव असेल आणि त्यामुळे राज्यपाल दु:खी असतील तर महाराष्ट्रातील संपूर्ण जनता त्यांच्या दु:खात सहभागी आहे, असा टोला त्यांनी लगावला.
राज्यपाल स्वत: झारखंडचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यामुळे त्यांना या मंत्रिमंडळाच्या कामकाजाची माहिती आहे. राज्यपालांनी सरकारला सहकार्य करावे. आम्ही पहिल्यापासूनच राज्यपालांचा आदर करत आहोत. राज्यपालांचा अनादर व्हावा असे कोणतेही कृत्य सरकारकडून किंवा मंत्रिमंडळातील कोणत्याही मंत्र्यांकडून झालेले नाही. राज्यपाल हे वडिलधारे आहेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले.