मुंबई – देशात 4-जी नेटवर्कमुळे प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रदेशात अनेक वेगवेगळे बदल पाहिले आहेत. “4-जी’मुळे मोबाईलवरुन अनेक कामे सहज शक्य होऊ लागली आहेत. पण आता लोक “5-जी’ची आतुरतेने वाट पाहात आहेत.
पुणे, मुंबई, गुरुग्राम, बंगळुरु, कोलकाता, दिल्ली, अहमदाबाद आणि हैदराबाद ही प्रमुख शहरे पुढील वर्षी 5-जी सेवा मिळवणारी शहरे असतील, असे दूरसंचार विभागाने अधिकृत निवेदनात म्हटले आहे. मार्च-एप्रिल 2022 मध्ये “5-जी’साठी स्पेक्ट्रम लिलाव आयोजित करण्याची सरकारची योजना आहे. 5-जी ( नेटवर्क)च्या प्रवेशाने खरी डिजिटल क्रांती अपेक्षित आहे.
या वर्षी सप्टेंबरमध्ये, दूरसंचार नियामक ट्रॉयकडून स्पेक्ट्रमच्या लिलावासाठी प्रामुख्याने राखीव किंमत, बॅंड योजना, ब्लॉक आकार, स्पेक्ट्रमचे प्रमाण इत्यादींवर शिफारसी मागवण्यात आल्या होत्या. ट्रॉयने या विषयावर उद्योगातील स्टेकहोल्डर्सशी काउन्सलिंग सुरू केले आहे.
दरम्यान, 5-जी तंत्रज्ञान ही सेल्युलर सेवेतील लेटेस्ट टेक्नोलॉजी आहे. याला 4-जी नेटवर्कची पुढील आवृत्ती म्हटले जाऊ शकते. यात वापरकर्त्यांना अधिक नेट स्पीड, कमी लेटेंसी आणि अधिक फ्लेक्सिबिलिटी पाहायला मिळेल. आतापर्यंत सेल्युलर तंत्रज्ञान कनेक्टिव्हिटीवर लक्ष केंद्रित करत असे, परंतु 5-जी सेल्युलर तंत्रज्ञान एक पाऊल पुढे जाईल आणि क्लायंटला थेट क्लाउडशी कनेक्ट करेल, असे मानले जात आहे.