मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यापासून सध्या सत्त्तेत असणाऱ्या सर्वच नेत्यांवर गद्दारी केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, याच मुद्द्यावर आता राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय का घेतला याविषयी स्पष्टीकरण दिले आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील भोरखेडा येथे विविध योजनांच्या उद्घाटनानंतर गुलाबराव पाटील बोलत होते. एकूण ४० आमदार फुटले. त्यात ३३ नंबरला मी गेलो, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
राज्यातील बंडखोरीवर बोलताना गुलाबराव पाटील यांनी,“नागपूरपासून दादरपर्यंत सर्व आमदार गेले. मी एकटाच राहिलो असतो. मग, विकास करू शकलो असतो का? पण, उद्धव ठाकरे चुकीच्या मार्गाने जात होते. त्यांना विनंती केली, हात जोडले, पाया पडलो,” असे म्हटले आहे.
पुढे बोलताना,“आपल्यातील एक मराठा चेहरा लांब जात आहे. तो जाता कामा नये. त्यांना समजवलं पाहिजे, असं उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं. त्यावर संजय राऊत म्हणाले, जायचं तर जाऊदे. मग मी पण गेलो. सरपंच पदाचा राजीनामा देताना लोकं विचार करतात. आम्ही तर आठ मंत्र्यांनी राजीनामा दिला होता. बहुमताचा आकडा जमला नसता तर? मात्र, आम्ही मंत्रीपदाचा सट्टा लावूनचा शिंदेंबरोबर जाण्याचा निर्णय घेतला,” असे गुलाबराव पाटलांनी यावेळी म्हटले.
तसेच “सात महिन्यांत एकनाथ शिंदे पाचवेळा जळगाव जिल्ह्यात आले आहेत. असा मुख्यमंत्री कोठेही सापडणार नाही. परंतु, आतापर्यंत त्यांच्याबरोबर होतो, तर चांगला होते. आता एकदम बिघडून गेलो. पश्चिम बंगालमध्ये सापडलेले २७ कोटी सापडले होते. ते आणण्याासठी एक ट्रक लागला. मग, ५० कोटी आणायला दोन ट्रक लागले असते ना,” असा सवाल खोक्यांच्या आरोपांवरून गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला.