* अहमदाबादसह 6 जिल्ह्यांत पूरस्थिती
* आतापर्यंत 61 बळी
अहमदाबाद – दक्षिण आणि मध्य गुजरातच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. अनेक सखल भाग जलमय झाले असून 6,000हून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. गुजरातमध्ये पावसाळ्यात आतापर्यंत 61 जणांचा मृत्यू झाला आहे.
दक्षिण गुजरातमधील डांग, नवसारी आणि वलसाड जिल्ह्यात येत्या पाच दिवसांत मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गुजरातमध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर महसूल मंत्री राजेंद्र त्रिवेदी यांनी सलग दुसऱ्या दिवशी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत मदतकार्याशी निगडित अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.
राज्यात मुसळधार पावसामुळे हजारो लोक बेघर झाले आहेत. छोटा उदयपूर, वलसाड आणि नवसारी येथे अनेकांनी स्थलांतर केले आहे. गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग आणि अनेक पंचायतींच्या मालकीचे रस्ते बंद झाले आहेत.
दक्षिण आणि मध्य गुजरातमधील 6 जिल्हे, छोटा उदयपूर, डांग, नर्मदा, वलसाड, नवसारी आणि पंचमहालमध्ये पुरामुळे शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. नवसारी आणि वलसाड जिल्ह्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे.
अतिवृष्टीची माहिती मिळताच पुरापूर्वी खबरदारी घेण्याच्या आणि बंदोबस्त करण्याच्या सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम घटनास्थळी कार्यरत आहे. विस्थापितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे 272 जनावरे दगावली आहेत.