दौंडला राज्यपाल नियुक्त आमदार देण्याची मागणी
राहुल अवचर
देऊळगाव राजे – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर भाजप आणि शिंदेगटाने जुळवून घेत सरकार सत्ता स्थापन केली. त्यामुळे दौंड तालुक्यात एकीकडे आमदार राहुल कुल यांना मंत्रीपद मिळावे, अशी मागणी होत असतानाच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांना राज्यपाल नियुक्त आमदारकीमध्ये संधी द्यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. त्यामुळे मंत्रिपदासह आमदारकीसाठी चढाओढ लागली असल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यात गेली अनेक वर्षांपासून पक्षाचे अस्तित्व ठिकवण्यासाठी वासुदेव काळे यांनी अविरतपणे प्रयत्न केले आहेत. 1990 साली भारतीय जनता पक्षाचे सुरुवात झाली आणि 1992 साली पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे युवा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. 1995 साली ते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विलास जाधव यांचा पराभव करून ते भाजपच्या कमळावर पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य झाले. त्याच्या बरोबर पंचायत समितीमध्ये राजेंद्र साळवे हे सुद्धा विजयी झाले होते. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी 1998 साली भाजपकडून त्यांनी आमदारकीची निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुभाष कुल यांच्या विरोधात लढवली. त्यानंतर सुभाष कुल यांच्यानंतर त्याच्या पत्नी रंजना कुल यांच्या विरोधात पोटनिवडणुक लढवली.
2009 साली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार राहुल कुल आणि अपक्ष उमेदवार रमेश थोरात यांच्या विरोधात आमदारकी लढवली पण तिन्ही वेळेस त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच त्यांनी भीमा पाटस कारखान्यावर संचालक म्हणून काम केले. 2001 साली त्याच्या पत्नी माधुरी काळे या जिल्हा परिषद सदस्य झाल्या. तर शेजारी असलेला बारामती तालुक्याच्या विरोधात ते आजपर्यंत पक्षासाठी एकनिष्ठपणे मोठा संघर्ष केला आहे.
2014 च्या निवडणुकीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर दौंड तालुक्यातील माजी आमदार रमेश थोरात असे दिग्गज नेते त्यांच्यासोबत असताना सुद्धा भाजप पुरस्कृत रासपचे उमेदवार महादेव जानकर यांच्या तालुक्यातील गावोगावी जाऊन प्रचार केला. एवढे मोठे आव्हान असतानाही काळे यांनी मोठ्या कष्टाने त्यावेळी जानकर यांना तालुक्यातून 26 हजारच्या आसपास लीड देण्यात आले होते. पक्षाच्या विविध पदांची जबाबदारी आतापर्यंत त्यांनी बजावली आहे.
त्यांच्यावर आता पक्षाकडून प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे त्यांनी आघाडी सरकारच्या काळात शेतकरी यांच्या हितासाठी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने केली. त्यामुळे शेतकरी कुटूंबात जन्माला आलेले वासुदेव काळे हे कुठल्याही राजकारणतील वारसा नसताना सुद्धा त्यांनी पक्षासाठी 30 वर्षे राष्ट्रवादी कॉंग्रेस बरोबर संघर्ष करीत पक्षाचे अस्तित्व टिकवले आहे. त्यामुळे तालुक्यात आमदार राहुल कुल यांना मंत्रिपद मिळणार की वासुदेव काळे यांना आमदारकीची संधी? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
कोण बाजी मारणार?
महाविकास आघाडीचे सरकार पडून शिंदे सरकार स्थापन झाले, त्यामुळे सहाजिकच प्रशासकीय पातळीवरून ते मंत्रिमंडळ बदलाचे वारे वाहू लागले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्याचा विचार केला तर मंत्रिपदासाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागाचा विचार केला तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे पारडे जड आहे. त्याला अपवाद फक्त दौंड विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात भाजपचे राहुल कुल हे एकमेव आमदार आहेत, त्यामुळे त्यांच्या नावाचा निश्चितच विचार होऊ शकतो. परंतु राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून वासुदेव काळे यांना संधी देण्याची मागणी जोर धरु लागली आहे. यामध्ये कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.