मुंबई – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आज देहरादूनला जाण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहचले असता त्यांना सरकारी विमानाने प्रवास करण्यास परवानगी नाकारण्यात आली. सरकारी विमानाने प्रवासाची परवानगी नाकारण्यात आल्यानं राज्यपाल खासगी विमानाने देहरादूनला पोहचले आहेत.
या प्रकरणानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार व राज्यपाल यांच्यातील वादांच्या मालिकेत आणखी एका वादाची भर पडली आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने घडलेल्या प्रकारावरून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. अशातच आता देहरादून येथे पोहचल्यानंतर खुद्द राज्यपाल कोश्यारी यांनी याबाबत भाष्य केलंय.
याबाबत विचारले असता राज्यपाल कोश्यारी यांनी, “काही कारणाने ते विमान मिळालं नाही म्हणून दुसऱ्या विमानाने प्रवास केला. एक विमान नाही आवडलं तर दुसऱ्या विमानाने प्रवास केला” असं स्पष्ट केलं. यावेळी मध्यप्रतिनिधींनी त्यांना, खासगी दौरा असल्याने परवानगी दिली नाही का? अशी विचारणा केली असता त्यांनी, “आयएएस अधिकाऱ्यांचा सत्कार हा खासगी दौरा कसा काय असू शकतो?” असा प्रश्न उपस्थित केला.
या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री सचिवालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. राज्यपाल सचिवालयानं विमान उपलब्धतेची खातरजमा करायला हवी होती असं मुख्यमंत्री सचिवालयाकडून सांगण्यात आलं. तसंच विमान उड्डाणाला मान्यता नसल्याचा संदेश आदल्याच दिवशी पाठवण्यात आला होता अशी माहिती देण्यात आली आहे.