मुंबई – राज्याच्या सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दोन्ही गटातील नेते याबाबत विविध प्रतिक्रिया देत आहेत. यातच आता कोर्टाच्या निकालानंतर दुसऱ्या दिवशी ठाकरे गटाने पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे – फडणवीस सरकारला मिळालेले जीवनदान तात्पुरत्या स्वरूपाचे असल्याचे म्हंटले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, “जीवदान मिळालं असेल तर ते तात्पुरतं आहे. जसं मी माझ्या नैतिकतेला जागून राजीनामा दिला तसं या बेकायदेशीर सरकारने राजीनामा द्यावा. मी जर राजीनामा दिला नसता तर मला पुन्हा मुख्यमंत्री करता आलं असतं, पण मी राजीनामा दिल्याने मला पुन्हा मुख्यमंत्री करता येत नाही, असे निकालपत्रात सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवलं आहे. याचाच अर्थ असा होतो की, आत्ताचं अस्तित्वात असलेलं सरकार हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. सत्ताधाऱ्यांचा खोटा चेहरा कोर्टाने उघड केला आहे.”
पुढे उद्धव ठाकरे यांनी शिंदे- फडणवीस सरकारला आव्हानही दिले आहे. “महाराष्ट्राची बदनामी थांबवली पाहिजे. धिंडवडे निघाल्यानंतर सर्वजण निवडणूकीला सामोरे जाऊ. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल त्यांनी दिला आहे. पण लोकशाहीत सगळ्यात शेवटचं न्यायालय जनतेचं असतं, त्यामध्ये जायला काय हरकत आहे. हा फैसला जनतेवर सोपवू आणि जनतेचा कौल स्विकारू,”असे उद्धव ठाकरे म्हणाले.”