मुंबई – गेल्या काही महिन्यांपासून राज्यामध्ये सत्ता संघर्ष सुरु आहे. आणि याच सत्तासंघर्षांवर नुकताच सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण असा निर्णय दिला असून राज्यातील शिंदे सरकार बचावले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरु झाले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडले. ‘उद्धव ठाकरेंनी पराभवाची लाज टाळण्यासाठी राजीनामा दिला…’ असा म्हणत देवेंद्र फडणवीसांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, यावर आज सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंनी तातडीची पत्रकार परिषद घेतली यावेळी उद्धव ठाकरेंनी राजीनाम्याबाबत आपलं मत स्पष्ट केलं. ते म्हणाले,’सर्वोच्च न्यायालयाने निकालात असं निरिक्षण नोंदवलं की, उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता, तर त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करता आलं असतं. मात्र, त्यांनी राजीनामा दिल्यामुळे पुन्हा मुख्यमंत्री करता येत नाही. याचाच अर्थ आत्ताचं अस्तित्वात असलेलं शिंदे-फडणवीस सरकार पूर्णपणे बेकायदेशीर आहे. मी राजीनामा दिला नसता तर मला पुन्हा मुख्यमंत्री केलं असतं. मात्र, मी माझ्या निर्णयावर आजही समाधानी आहे. मी माझ्यातील नैतिकतेला जागून राजीनामा दिला. याचं कारण मी सांगितलं आहे.’