Ravindra Waikar । देशातील लोकसभा निवडणुकीदरम्यान, प्रत्येक नेता एकमेकांच्या विरोधात टीका करत आहे. त्यातच पक्ष बदलाचे वारे देखील तेवढ्याच वेगाने होतायत. दरम्यान, “मला चुकीच्या प्रकरणात गोवण्यात आले. त्यानंतर माझ्यासमोर तुरुंगात जाणे किंवा पक्ष बदलणे हे दोनच पर्याय उरले होते. जड अंतःकरणानेच मी पक्ष बदलला. नियतीने अशी वेळ कोणावरही आणू नये,” असे वक्तव्य शिंदे गटाचे वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी केले. रवींद्र वायकर यांच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडालीय.
जड अंतःकरणानेच मी पक्ष बदलला Ravindra Waikar ।
रवींद्र वायकर यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत यासंदर्भात भाष्य केले. त्यांनी म्हटले की, “मला चुकीच्या प्रकरणात गोवल्यानंतर माझ्याकडे गजाआज जाणे किंवा पक्ष बदलणे, हे दोनच पर्याय उरले होते. दबाव तर होताच, परंतु पत्नीचेही नाव गोवले गेल्यावर माझ्यापुढे पर्याय नव्हता. जड अंतःकरणानेच मी पक्ष बदलला. माझ्यावर नियतीने जी वेळ आणली, ती कोणावरही येऊ नये, असे रवींद्र वायकर यांनी म्हटले आहे. त्यांच्या वक्तव्याने ते मानाने आजही ठाकरे गटात असल्याचे सिद्ध झाले.
परंतु नियतीने माझ्यासमोर यक्षप्रश्न निर्माण केला Ravindra Waikar ।
माझ्या हातातील शिवबंधन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वेळेपासून आहे व खांद्यावरचे शिवधनुष्यही. बाळासाहेबांच्या शिवसेनेत 50 वर्षे राहिल्यानंतर मला उद्धव ठाकरे यांची साथ सोडावी लागली, तेव्हा एखाद्या कुटुंबसदस्याला आपण पारखे होतो, तशीच माझी भावना होती. परंतु नियतीने माझ्यासमोर यक्षप्रश्न निर्माण करून ठेवला व नियतीच कसा बदल घडवून आणू शकते, ते सर्वांनीच पाहिले आहे, वायकर यांनी म्हटले.
रवींद्र वायकर यांनी स्पष्टपणे दबाव असल्यामुळेच आपण शिंदे गटात प्रवेश केल्याची कबुली दिली आहे. यामुळे आता एकनाथ शिंदे यांची गोची होऊ शकते. लोकसभेची उमेदवारी दिलेला नेता आपल्याला दबावाखाली शिंदे गटात प्रवेश करावा लागला, असे म्हणत असेल तर विरोधकांच्या दाव्याला आणखीनच बळ मिळू शकते. ईडी आणि सीबीआयचा वापर करुन विरोधी पक्षातील नेत्यांना भाजप आणि शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी भाग पाडले जात आहे, असा आरोप वारंवार विरोधक करतात. आता मुंबईतील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रवींद्र वायकर यांच्या वक्तव्याचे भांडवल करुन विरोधक भाजप आणि शिंदे गटाविरोधात वातावरणनिर्मिती करु शकतात.