माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सडकून टीका
पुणे – आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची आर्थिक स्थिती झपाट्याने खालावत चालली आहे. भारताचा विकास दर अत्यल्प झाल्याने देशात आर्थिक मंदीचे वातावरण आहे. या परिस्थितीला मोदी सरकार जबाबदार असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी केली.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे व इतर उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, केंद्रीय अर्थसंकल्प दि.1 फेब्रुवारीला सादर होणार आहे. परंतु, सध्या देशाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. पंतप्रधान व अमित शहा स्वत: अर्थसंकल्पाची तयारी करत असून या प्रक्रियेपासून अर्थमंत्र्यांना दूर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे येणारा अर्थसंकल्प अर्थमंत्रालयाचा नसून मोदींचा आहे. याचबरोबर, देशाचा विकासदर साडेचार टक्के असल्याचे सरकारने सांगितले आहे. तो वाढवण्याची गरज आहे.
भारताचे दरडोई उत्पनाच्या पाचपट चीनचे उत्पन्न असल्याने भारत विकासाच्या बाबतीत किती मागे आहे, याची कल्पना येते. याचबरोबर 2025 पर्यंत देशाची इकॉनॉमी 5 ट्रिलियन डॉलर करण्याची सरकारची घोषणा फसवी आहे. महागाईचा दर 7.3 असून मागील सहा वर्षांतील सर्वांत उच्चांकी आहे. भाजपच्या काळात तरुणांना रोजगार नाही, बॅंकांचे घोटाळे वाढत चालले असून बांधकाम, उद्योग क्षेत्रात मंदी आली आहे. यातूनच अर्थव्यवस्था झपाट्याने खालावत आहे. मागील पाच वर्षांत चुकीच्या निर्णयांचा फटका अर्थव्यवस्थेला बसला आहे.
पुण्यातही नाइट लाइफबाबत विचार
नाइट लाइफसारखी धोरणे राबवताना पोलिसांना खूप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पहिल्यांदा मुंबईतील काही भागांत हे धोरण यशस्वी होते का, हे पाहून पुण्यात ते राबवण्याचा निर्णय घेऊ, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.