कराची – भारतात सध्या असलेल्या “धार्मिक राष्ट्रवादी’ सरकारसोबत कोणतीही अर्थपूर्ण चर्चा होण्याची शक्यता नाही, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये असलेल्या काश्मिरच्या प्रश्नामुळे हा भाग विकासापासून वंचित राहिल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
इम्रान खान म्हणाले, सध्या भारतामध्ये जोपर्यंत राष्ट्रवादी विचारधारेचे सरकार आहे तोपर्यंत या दोन देशांमध्ये कोणतीही अर्थपूर्ण चर्चा होणे शक्य नाही. येत्या काळात भारतात तर्कसंगत सरकार असेल अशी मला आशा आहे. त्या सरकारसोबत चर्चा होऊ शकेल आणि विवादीत मुद्दे सोडवले जातील, असेही त्यांनी सांगितले.
भारत आणि पाकिस्तान दरम्यान वादाचा असलेल्या पाकिस्तानचा मुद्दा सोडवला गेला तर इतर मुद्दे म्हणजे दहशतवाद आणि वातावरण बदल अशा समस्यांना सामोरं जाता येईल.
दरम्यान, भारतात 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर त्यांनी पाकिस्तानविरोधात कडक भूमिका घ्यायला सुरुवात केली. पाकिस्तान जोपर्यंत भारतातील दहशतवादी कारवाया थांबवत नाही, दहशतवादाला खतपाणी घालायचे थांबवत नाही तोपर्यंत त्या देशासोबत कोणतीही चर्चा होणार नाही अशी भूमिका भारताने घेतली. त्यामुळे गेल्या आठ वर्षांपासून या दोन देशांदरम्यान कोणतीही द्विपक्षीय चर्चा झाली नाही.