नगर – राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पाणी आणि चार्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. याबाबत सरकारने कुठलेही उपाययोजना केलेल्या दिसत नाहीत. शरद पवारांनी महाराष्ट्रात काय केले हे विचारण्यापेक्षा आपण २०११ ते २०२४ या काळात दहा वर्षा राज्यात नेमकं काय केलं असा प्रतिप्रश्न करत राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार यांनी भाजपावर हल्ला चढविला. त्यांच्याआधी १० वर्षं मी सत्तेत होतो, तेव्हा माझ्या काळात शेतीचे काय काम झाले, हे सगळ्या जगाला माहिती आहे, असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना टोला लगावला.
यावेळी पत्रकार परिषदेस आमदार निलेश लंके, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दक्षिण जिल्हा संपर्कप्रमुख शशिकांत गाडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदी उपस्थित होते.
अहमदनगर लोकसभेची निवडणूक ही पवार विरुद्ध विखे, अशी नाही कारण माझा इथून काही उमेदवारी अर्ज नाही. आ. निलेश लंके हे आमच्याकडून निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या विरोधात कोण आहे आणि ते काय बोलतात, यावर भाष्य करणे मला योग्य वाटत नाही, असे शरद पवार म्हणाले.
नगरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत खा. शरद पवारांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. शरद पवार म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आहे. भाजपाने जो काही ४०० पारचा नारा केलेला आहे. तो चुकीचा वाटतो. त्यांनी जर सर्वच्या सर्व जागा जिंकू, असे म्हटले असते तर मान्य ही केले असते. महाराष्ट्रात सिंचन घोटाळा झाला हे मोदींनी भाषणातून अनेक वेळा सांगितले. परंतु हा घोटाळा कोणी केला. ते त्यांनी अजून स्पष्ट केलेले नाही. त्यांनी ते स्पष्ट करावे. ते ज्यांच्याबाबत बोलत आहेत. त्यांनाच घेऊन मोदी महाराष्ट्रभर फिरत आहेत, अशी ही टीका पवार यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गट यावेळी लोकसभेच्या १० जागा लढवत आहे. राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव पाहाता १० जागा कमी असल्याचे बोलले जात होते. मात्र, आमचे लक्ष्य विधानसभा निवडणुकांवर असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी नगर जिल्ह्यातील राजकारणाबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी विखे पाटलांना टोला लगावला आहे.
आरक्षणाची भाजपकडून फसवणूक
धनगर आरक्षणाचा निर्णय पहिल्या कॅबिनेटमध्ये घेऊ, असे देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत येऊन सांगितलेले होते. त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. उपमुख्यमंत्री झाले. मात्र गेल्या दहा वर्षात धनगर आरक्षणाचा कोणताही निर्णय भाजप सरकारने घेतला नाही. आरक्षणाबाबत धनगर समाजाची भाजपने फसवणूक केली आहे, असे खा. शरद पवार म्हणाले.