मुंबई : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या कामाच्या धडाक्यासाठी ओळखले जातात. एवढाच नाही तर त्यांचा स्पष्टवक्तेपणा हा सर्वांनाच माहिती आहे. याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. कारण देशभरातील अनेक प्रकल्प रखडले आहेत. मुंबई-गोवा महामार्गाप्रमाणेच अनेक प्रकल्पांना लेटमार्क लागला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी मोठे वक्तव्य करत सरकारच्या हस्तक्षेपावरून त्यांनी सरकारलाच घरचा आहेर दिला आहे.
नागपूरच्या एका कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी, “गॉड आणि गर्व्हनमेंटवर आपल्या सगळ्यांचा विश्वास असतो. सरकारचा हस्तक्षेप, सरकारचा सहभाग किंवा सरकारची छाया देखील ज्या प्रकल्पावर पडते तो प्रकल्प नष्ट होतो, या थेअरीचा मी समर्थक आहे. सरकार म्हणजे विषकन्येसारखं असतं. सरकारपासून जो दूर राहील तो प्रगती करू शकेल.” सरकारच्या हस्तक्षेपावर नितीन गडकरी यांनी थेट भाष्य केल्याने यावरून आता पुन्हा राजकारण रंगण्याची शक्यता आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना १०० कोटींच्या खंडणी मागून बॉम्बस्फोटमध्ये उडविण्याची धमकी देण्याच्या गुन्ह्याचा सूत्रधार लष्कर ए तोयबा आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा माजी सचिव अफसर पाशा याला नागपूर पोलिसांनी बेळगाव कारागृहातून ताब्यात घेतले. त्याला नागपुरात आणले असून त्याची आणि जयेश पुजारी याची समोरासमोर चौकशी करण्यात येणार आहे.
२१ मार्चला गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालात बेळगाव कारागृहातून जयेश पुजारी याने तीन फोन केले व १०० कोटी रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास बॉम्बस्फोटात उडविण्याची धमकी दिली. या प्रकरणात पहिल्यांदा बेळगाव कारागृहातून जयेश पुजारी याला नागपूर पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर युएपीए कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.