कर्मचाऱ्यांसाठी औषध आणि उपचाराचीही व्यवस्था
पुणे – लॉकडाऊन काळात बॅंकांतील कर्मचारी जोखीम घेऊन सेवा देत आहेत. त्यांना मानसिक आधार मिळावा याकरिता अर्थमंत्रालयाने सरकारी बॅंकांतील कर्मचाऱ्यांचा 20 लाख रुपयांचा विमा उतरविला आहे.
सहकारी बॅंकांत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक औषध, उपचाराच्या सोयी उपलब्ध केल्या आहेत. कर्मचाऱ्यांची योग्य काळजी घेतली जावी याकरिता बऱ्याच बॅंकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. अर्थमंत्रालयाने या संदर्भात जारी केलेल्या पत्रकानुसार विविध बॅंकांच्या व्यवस्थापनांनी यासाठी आवश्यक त्या योजना तयार केल्या आहेत. त्यानुसार अशा कर्मचाऱ्यांना 20 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळणार आहे.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून बॅंकिंग व्यवहाराला अत्यावश्यक सेवा समजले आहे आणि या काळातही देशभरातील सर्व बॅंकांतील कर्मचारी पुरेशी काळजी घेऊन ग्राहकांना सेवा देत आहेत. यामुळे या काळात भारतातील बॅंक ग्राहकांना फारसा त्रास झालेला नाही. याबद्दल अर्थमंत्रालयाने बॅंकिंग कर्मचाऱ्याचे आभार मानले आहेत. स्टेट बॅंक, पंजाब नॅशनल बॅंक, युनियन बॅंक ऑफ इंडिया, इंडियन बॅंक आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. स्टेट बॅंकेने डॉक्टर आणि मनोविश्लेषक तयार ठेवले आहेत.