मुंबई : महाविकास आघाडीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्यासाठी दीर्घकाळ संप पुकारण्यात आला होता. त्यानंतर तत्कालीन सरकारने मध्यस्थी करत वेतनवाढ आणि वेतन हमी दिल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला. मविआ सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात गोपीचंद पडळकर हे सक्रिय होते. मात्र आता राज्यात पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिल्याने पुन्हा एकदा पडळकर यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यांच्यावर ठाकरे गटाकडून सडकून टीका करण्यात आली आहे.
ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी गोपीचंद पडळकरांचा उल्लेख ‘तमासगीर’ असा केला आहे. “गोपीचंद पडळकर तमासगीर आहे. लाज वाटली पाहिजे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा तमाशा केला त्यांनी. टाळ काय वाजवतायत? बोलतायत काय? तेव्हा मागणी केली होती की एसटी महामंडळ शासनात विलीन करा. अशीच आहे त्यांची मागणी. आता ते का गप्प आहेत? कारण पगार देता येत नाही”, असं अरविंद सावंत म्हणाले आहेत.
“उद्धव ठाकरेंनी महिन्याला ३६० कोटी रुपये महामंडळाला द्यायचा निर्णय घेतला. दिवाकर रावते आणि अनिल परब यांनी आणलेला निधी एसटी महामंडळाच्या इतिहासात सर्वाधिक आहे. हजार कोटी रुपये तर एका वेळी आणले अनिल परब यांनी. अनेक निर्णय त्या दोघांनी घेतले. मग ही कोण माणसं निर्माण झाली ज्यांचा काहीच संबंध नाही? काय बोलतात, जाऊ द्या”, असेही अरविंद सावंतांनी यावेळी म्हटले. दरम्यान, मोहीत कंबोज यांनी केलेल्या टीकेलाही अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिलं. “मोहित कम्बोज कोण? पैशाने श्रीमंत झाला म्हणजे अकलेनं श्रीमंत झाला का? कंबोज तिकडे आहेत म्हणून वाचलेत.. नाहीतर त्यांच्यावरही ईडी धाड टाकेल”, असे सावंत म्हणाले.
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे सेवाशक्ती संघर्ष या एसटी कामगारांच्या संघटनेचे नेते आहेत. एसटी कामगार संघ आणि सेवाशक्ती संघर्ष या संघटनांनी आपल्या १६ मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी २८ फेब्रुवारीसापासून आझाद मैदानावर आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. महामंडळाने या इशाऱ्याची दखल घेऊन आंदोलकांना आंदोलनापासून परावृत्त करण्यासाठी शिस्तभंगाच्या कारवाईचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.