पुणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागात एप्रिल ते सप्टेंबर या महिन्यात 43 हजार 529 जन्मांपैकी 86 बालकांचा मृत्यू झाला आहे. साधारण एक हजारच्या मागे हा मृत्यूदर 1.97 टक्के इतका असून, बालमृत्यूदर कमी आहे. जिल्हा परिषदेने बालमृत्यू रोखण्यात मोठे यश मिळवले आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
जन्मजात विकृती, श्वसन विकास, अपघात, प्राण्यांचा चावा, न्यूमोनिया, जन्मजात वजन कमी, अतिसार, नवजात शिशूमृत्यू यामुळे बालकांचा मृत्यूदर वाढत असतो. जिल्ह्याचा मृत्यूदर कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेने आरोग्य सुविधांमधील तफावती शोधून काढल्या. त्यावर काम करून सार्वजनिक निधी व “सीएसआर’कडून मिळणारा पाठिंब्याच्या जोरावर प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विविध सुविधा निर्माण केल्या. “सुरक्षित माता’ या अभियानांतर्गत 98 टक्के महिलांची तपासणी आरोग्य विभागाकडून झाली आहे.
महिला गरोदर असल्याचे समजात लगेच संबंधित मातांची आरोग्य विभागाकडून नोंदणी केली जाते. त्यानंतर त्यांच्या आरोग्याची काळजीही घेतली जाते. महिला व बालकल्याण विभागाकडून गरोदर मातांसाठी पौष्टीक खाद्यपदार्थही दिले जाते. वेळोवेळी आरोग्य विभागाकडून गरोदर मातांना आरोग्य विषयक सल्ला दिला जातो, असेही प्रसाद यांनी सांगितले.
बालमृत्यूदर कमी होण्यामध्ये बालकांची आरोग्य तपासणी या मोहिमेने मोलाची कामगिरी बजावली आहे. या मोहिमेत उपचारांची गरज असणारे बालके समोर आल्याने त्यांच्यावर वेळेत उपचार झाले. आतापर्यंत 500हून अधिक शस्त्रक्रिया झाल्या आहेत. जिल्हा परिषदेकडून आरोग्य सेवा आणि बाल आरोग्य तपासणीमुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पुणे ग्रामीण भागातील बालमृत्यूचे प्रमाण कमी असल्याचेही त्यांनी सांगितले.