पुणे, दि. 20 -समाजाकडूनच कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी आता पुढाकार घेतला जात आहे. परंतु, त्यामध्ये एक किंवा दोन अपत्ये झाल्यावर महिलांनीच शस्त्रक्रिया करून घ्यावी, असा समज रूढ झाला आहे. पुरुषांकडून मात्र या शस्त्रक्रियांना नकार दिला जातो. महिलांच जबाबदारी घेत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेत आहेत. पुणे जिल्हा देखील याला अपवाद नाही. महिलांच्या तुलनेत पुरुष या शस्त्रक्रियेसाठी पाठ फिरवित असल्याचे दिसून येत आहे.
राज्य सरकारकडून शस्त्रक्रिया करणाऱ्या पुरुषांना 1 हजार 451 रुपये, तर दारिद्य्ररेषेखालील महिलांना 600 रुपये, त्यावरील संवर्गातील महिलांना अवघे 250 रुपये प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाते, असे असतानाही सुखी संसारासाठी महिलाच पुढाकार घेत आहेत.
पुणे ग्रामीण जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांत जिल्ह्यात केवळ 59 पुरुषांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली आहे. त्यात महिलांची संख्या 10 हजार 883 आहे. आतापर्यंत झालेल्या शस्त्रक्रियेच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण खूपच कमी आहे. सर्वसाधारणपणे वयाच्या 45 वर्षांपर्यंत कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या आशा सेविका घरोघरी भेटी देऊन कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे महत्व अधोरेखित करत आहेत. ही शस्त्रक्रिया वय 40 ते 45 वर्षांपर्यंत केली जाऊ शकते. याबद्दल फक्त महिलाच पुढाकार घेताना दिसतात, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांची तालुका निहाय संख्या
आंबेगाव – 753, बारामती – 856 , भोर – 336, दौंड – 1202, हवेली – 1548, इंदापूर -820, जुन्नर – 1155, खेड – 923, मावळ – 868, मुळशी -395, पुरंदर – 566, शिरुर – 1370, वेल्हा -130. एकूण – 10,922