नवी दिल्ली :- भालाफेकपटू निरज चोप्रा याने जागतिक ऍथलटिक्स स्पर्धेत मिळवलेले सुवर्णपदक देशात मैदानी खेळांसाठी अच्छे दिन येत असल्याची नांदी आहे, अशा शब्दात केंद्रिय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी निरजचे कौतुक केले आहे.
जागतिक ऍथलेटिक्समध्येच नव्हे गेल्या दोन मोसमात पार पडलेल्या इतर अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये नीरजने सुवर्णपदक पटकावले आहे. ऍथलेटिक्स क्षेत्रात भारतासाठी ही मोठी कामगिरी आहे. निरजच्या या कामगिरीमुळे नव्या पीढीसमोर नवी प्रेरणा ठरणार आहे. यातूनच देशाला नवनवीन पदकविजेते खेळाडू मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नीरजने आशियाई क्रीडा स्पर्धांपासून राष्ट्रकुल, टोकियो ऑलिम्पिक, चॅम्पियन लीगचे विजेतेपद आणि 20 वर्षांखालील गटातील स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले आहे. जागतिक स्पर्धेतही पहिल्या सहा खेळाडूंमध्ये भारताच्या तीन खेळाडूंची नावे आल्याचा मला आनंद आहे. पाचव्या क्रमांकावर किशोर जीना आणि सहाव्या क्रमांकावर मनू डीपी यांनीही चमकदार कामगिरी केली आहे. ही भारताच्या जागतिक वर्चस्वाची सुरुवात आहे, असेही ते म्हणाले.
गेल्या काही महिन्यांत भारताने विविध क्रीडा प्रकारात चमकदार कामगिरी केली आहे. कुस्ती, नेमबाजी, तिरंदाजीच नव्हे तर आता भालाफेक आणि ऍथलेटिक्समध्येही हे स्पष्टपणे दिसत आहे. आमच्या खेळाडूंनी 4 बाय 400 रिले शर्यतीतही चांगली कामगिरी केली आहे. यावरून भारतीय क्रीडा क्षेत्रात अनुकुल वातावरण निर्माण झाल्याचेही दिसून येत आहे, असेही ते म्हणाले.
पंतप्रधानांच्या निर्णयांमुळेच यश…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही क्रीडा क्षेत्रासाठीच्या अंदाज पत्रकात तीन पट वाढ केली होती. तसेच खेलो इंडिया योजना, खेलो इंडिया केंद्रे उघडण्यात आली, नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स सुरु करण्यात आले. त्यामुळे खेळाडूंच्या सुविधाही वाढल्या आणि त्यामुळेच खेळाडूंनी देशासाठी पदकेही जिंकली. हे यश सगळ्या जास्त पदकविजेत्यांचे असले तरीही त्यामागे पंतप्रधानांचा पाठींबाही महत्वाचा आहे, असेही ठाकूर म्हणाले.