मुंबई – टोमॅटो, कांदे आणि इतर भाज्यांचे दर सध्या जास्त पातळीवर आहेत. दरवर्षी आगस्टच्या सुमारास भाज्याचे दर वाढत असतात. सप्टेंबर पासून भाजीचे दर कमी होतील, असे रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटले आहे.
दास यांनी सांगितले की, भाजीचे दर वाढल्यामुळे जुलै महिन्यात किरकोळ महागाईचा दर 7.44% या 15 महिन्याच्या उच्चांकी पातळीवर गेला आहे. सप्टेंबर महिन्यापासून भाज्याचे दर कमी होतील. किरकोळ महागाईचा दर त्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. अन्नधान्याच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण आहे. त्यामुळे जागतिक परिस्थिती खराब असली तरी भारतात अन्नधान्याच्या किमती फारश्या वाढणार नाहीत याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
महागाई जास्त पातळीवर राहू नये आणि त्याचा व्याजदरावर परिणाम होऊ नये यासाठी रिझर्व्ह बॅंक योग्य वेळी आवश्यक त्या उपाययोजना करत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सप्टेंबर 2022 पासून महागाई कमी करण्याचा रिझर्व्ह बॅंकेने प्रयत्न केला आहे. महागाई 4% च्या जवळपास आली होती. मात्र जुलै महिन्यामध्ये ही महागाई वाढली आहे. ही महागाई दीर्घकाळ वाढणार नाही याची आम्हाला खात्री आहे. मात्र तरीही परिस्थितीकडे आमचे बारीक लक्ष आहे.
मे 2022 मध्ये महागाई 8% च्या जवळपास गेल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने मे 2022 पासून पाच टप्प्यात व्याजदरात तब्बल अडीच टक्क्याची वाढ केली आहे. त्यानंतर महागाई चार टक्क्याच्या जवळपास आल्यानंतर गेल्या दोन पत धोरणांत रिझर्व्ह बॅंकेने व्याजदर वाढ थांबविली आहे. विकासदर वाढण्यासाठी महागाई कमी पातळीवर राहून व्याजदर कमी राहण्याची आवश्यकता आहे. याच दृष्टिकोनातून रिझर्व्ह बॅंक गेल्या दोन वर्षापासून प्रयत्न करीत आहे. यामुळे खासगी क्षेत्राकडून भांडवली गुंतवणूक वाढण्याची शक्यता वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.
दास यांनी सांगितले की, रुपयाचा भाव कोणत्या पातळीवर स्थिर राहावा हे आम्ही ठरविलेले नाही. मात्र भारत परकीय चलन संवर्धनासाठी प्रयत्न करत आहे. गेल्या पतधोरणात रिझर्व बॅंकेने रेपो दरात वाढ केली नसली तरी भांडवल सुलभता कमी केली आहे. त्यामुळे महागाई कमी होण्यास मदत होईल असा दावा त्यांनी केला.