नवी दिल्ली : देशाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून रोज नवनव्या योजनांची घोषणा करण्यात येत असते. त्याची अंमलबाजवणी देखील स्थानिक पातळीवर करण्यात येत असते. त्यातच केंद्र आणि राज्याच्या धर्तीवर स्थानिक पातळीवर देखील गावच्या विकासासाठी नव्या योजना आखल्या जातात. दरम्यान, भारतात अशाच एका गावाने गावाच्या विकासासाठी एक भन्नाट अशी सोनेरी योजना सुरू केली आहे. जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात एक गाव आहे, जिथे लोक प्लास्टिकमुक्त पृथ्वीचे स्वप्न पाहत आहेत. त्यासाठी त्यांनी पुढाकारही घेतला आहे. एका हिंदी संकेतस्थळाने याविषयी माहिती दिली.
समोर आलेल्या माहितीनुसार सध्या हे गाव चर्चेचा विषय बनत आहे. याठिकाणी तुम्हाला 20 क्विंटल प्लास्टिक कचरा देण्यासाठी एक सोन्याचे नाणे मिळत आहे. हे गाव सध्या प्लास्टिकमुक्त आहे. हे गाव सध्याच्या दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात आहे. सादिवरा असं या गावाचं नाव आहे. येथील सरपंचांनी गाव प्लास्टिकमुक्त करण्याचा मोठा उपक्रम सुरू केला. गावचे सरपंच फारुख अहमद गनई यांना गाव प्लास्टिकमुक्त करायचं आहे. व्यवसायाने वकील असलेल्या गनई यांनी अनेक प्रयत्न केले, मात्र फारसे यश मिळाले नाही. पण त्यांनी अशी घोषणा केल्याने लोकांची गर्दी झाली. ही गोष्ट जाहीर होताच कचरा कमी होऊ लागला.
सरपंचांनी ‘प्लास्टिक दो और सोना लो’ ही मोहीम सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. या योजनेंतर्गत कोणी 20 क्विंटल प्लास्टिक कचरा दिल्यास पंचायत त्याला सोन्याचे नाणे देईल. मोहीम सुरू झाल्यानंतर अवघ्या 15 दिवसांत संपूर्ण गाव प्लास्टिकमुक्त घोषित करण्यात आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. हे पाहून जवळपासच्या इतर अनेक पंचायतींनीही त्याचा अवलंब केल्याचे अनेक रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.
दुसरीकडे या गावचे सरपंचांनी या योजनेविषयी सांगतांना, मी माझ्या गावात बक्षिसाच्या बदल्यात पॉलिथिन देण्याची घोषणा केली, जी यशस्वी झाली. नद्या-नाले स्वच्छ करण्यासाठी मी पुढाकार घेतला होता. इतर काही गावांची चर्चा इतर मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आली आहे, जिथे प्लास्टिक कचरा दूर करण्यासाठी विविध उपायांचा अवलंब करण्यात आला आहे. यापैकी एक मार्ग म्हणजे सोने देणे. त्यात बऱ्यापैकी यशही आले आहे. असे त्यांनी म्हटले आहे.