मुंबई – अजित पवार यांनी अर्थमंत्रिपद स्वीकारल्यानंतर निधीचं वाटप करण्यात आलं आहे. मात्र निधी वाटपात अजित पवार भेदभाव करत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी केला आहे. यापूर्वी महाविकास आघाडीमधील सरकारमध्ये अजित पवार अर्थमंत्री असताना ते निधी वाटपामध्ये भेदभाव करत असल्याचा आरोप शिवसेनेतील एका गटाने केला होता.
त्यानंतर शिवसेनेतील एक गट एकनाथ शिंदे नेतृत्वाखाली महाविकास आघाडीतील सरकारमधून बाहेर पडला. मात्र शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी केल्यानंतर अर्थमंत्रीपदाबाबत अजित पवार पुन्हा एकदा भेदभाव करत असल्याचा आरोप केला जात आहे.
अजित पवार यांच्यासोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना भरघोस निधी देण्यात आला. मात्र आम्हाला काहीच निधी देण्यात आला नाही, असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे. काँग्रेसच्या काही निवडक आमदारांनाही निधीचं वाटप करण्यात आलं असा दावाही यशोमती ठाकूर यांनी केला आहे. निधी न देणाऱ्या अजिदादांना यशोमती ठाकूर यांनी विदर्भातील अमरावती विभागातील जनता टॅक्स भरत नाही का? आम्हाला निधी न देण्याचं कारण काय? असा सवाल केला आहे.
अर्थमंत्रिपद मिळताच अजित पवार यांनी सहकारी आमदारांना खूश करून टाकले आहे. बंडात साथ देणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदारांना प्रत्येकी 25 कोटी रुपयांचा निधी दादांनी दिला आहे. भाजप आणि शिंदे गटालाही त्यांनी भरघोस निधीचे वाटप केले आहे. शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी 150 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका माध्यमाशी बोलताना अजित पवार यांनी विरोधक आरोप करत आहेत, मात्र त्यात काहीही तथ्य नाही. निधी वाटपात कोणावरही अन्याय झालेला नाही. सर्व आमदारांना समसमान निधी वाटप करण्यात आल्याचे म्हंटले आहे.