-अरुण गोखले
स्वतिश्री गणनायकं गजमुखं, मोरेश्वरं सिद्धिदम्।
बल्लाळं मुरूडं विनायक मढं चिंतामणि थेवरम्।
लेण्याद्री गिरीजात्माजम् सुवरदम् विघ्नेश्वरम् ओझरम्।
ग्रामो रांजण संस्थितम् गणपती, कुर्यात सदा मंगलम।।
या शब्दांत आपण बुद्धिदात्या, ज्ञानदात्या, संकटनिवारक आणि विघ्नहर्त्या श्री गणेशाचे मोठ्या भक्तिभावाने स्तवन करतो. हा श्लोक श्री गणेशाच्या महाराष्ट्रातील आठ गावांतील अष्टरूपांचे वर्णन करणारा आहे.
या आठही गावांतील गणेशांचे तिथे जाऊन दर्शन घेणे ह्यालाच “श्री गणेश अष्टविनायक दर्शनयात्रा’ असे म्हणतात. ही आठही स्थाने तशी जवळजवळच असल्याने केवळ दोन दिवसांतच अष्टविनायक दर्शनयात्रा आपण पूर्ण करू शकतो. त्यानुसारच ह्या यात्रेचे यात्रा कंपन्या आणि वैयक्तिकदृष्ट्या आयोजन केले जाते.
या आठही गावी विराजमान असलेला श्री गणेश हा वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध आहे. मोरगावचा गणपती हा श्री मोरेश्वर, सिद्धटेकचा श्री सिद्धीविनायक, पालीचा श्री बल्लाळेश्वर, महड गावचा गणपती हा श्री वरदविनायक, थेऊरचा श्री चिंतामणी, लेण्याद्रीचा श्री गिरीजात्मक तर ओझरचा श्री विघ्नेश्वर आणि रांजणगावचा गणपती हा श्री महागणपती ह्या नावांनी प्रसिद्ध आहे.
या अष्टविनायकांपैकी पुणे जिल्ह्यातच मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर आणि लेण्याद्री हे पाच गणपती येतात. रायगड जिल्ह्यात महाड आणि पाली येथील दोन गणपती येतात. तर आठवा गणपती हा अहमदनगर जिल्ह्यातील सिद्धटेक येथील आहे. ही आठही स्थाने मोठी रम्य आणि दर्शनीय आहेत.
ही अष्टविनायकांची यात्रा कशी व कोणत्या क्रमाने करायची यासंदर्भात असे सांगितली जाते की-प्रथम मोरगावच्या श्री मोरेश्वराचे दर्शन घेऊन ह्या यात्रेस प्रारंभ करावा. त्यानंतर सिद्धटेक, पाली, महाड, थेऊर, लेण्याद्री, ओझर आणि रांजणगाव अशी ही यात्रा करावी.
या शास्त्रोक्त अष्टविनायक यात्रेची सांगता पुन्हा मोरगावच्या गणेशाचे दर्शन घेऊन करावी. अनेक गणेशभक्त हे यात्रेच्या स्वरूपात ह्या गणेश दर्शनास न जाता आपापल्या सोयी आणि सुविधेनुसार ह्या गावी जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेतात. या मागील भक्तांच्या मनातील श्रद्धा आणि गणेशभक्ती ह्याला जास्त प्राधान्य आहे.