नवी दिल्ली – कॉंग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण करणाऱ्या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या 23 नेत्यांपैकी एक असणारे माजी केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्या पत्राचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. पक्षात नेतृत्वबदल व्हावा हा पत्रामागील उद्देश नव्हता, असे त्यांनी म्हटले.
कॉंग्रेसच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र पाठवून तातडीने संघटनात्मक पातळीवर सुधारणा करण्याची भूमिका मांडली. पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष असावा, अशी मागणीही त्यांनी केली.
त्या पत्रामुळे कॉंग्रेसमध्ये नेतृत्वाच्या मुद्द्यावरून मतभेद असल्याचे चित्र निर्माण झाले. पत्रप्रपंच करणारे नेते स्वपक्षीयांच्या टीकेचे धनी बनल्याने कॉंग्रेसमध्ये सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आले.
त्यापार्श्वभूमीवर, प्रसाद यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पत्रामागील भूमिका सांगितली. पक्षाला नवचैतन्य मिळवून देण्यासाठी काय करता येईल ते सुचवणे हा पत्रामागील एकमेव उद्देश होता, असे त्यांनी नमूद केले.
पक्षनेतृत्वाला लक्ष्य करण्याचा हेतू त्यामागे नव्हता. सोनिया आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यांचाही माझ्यावर विश्वास आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.