श्रीनगर -जम्मू-काश्मीरात शनिवारी सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांना ठार केले. त्यामुळे काश्मीरमध्ये 2 दिवसांत 7 दहशतवाद्यांचा खात्मा झाला. त्यामुळे दहशतवादी संघटनांना जबर हादरा बसला आहे.
दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यानंतर दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोहीम हाती घेण्यात आली. दहशतवादी दडलेल्या ठिकाणाला सुरक्षा जवानांनी वेढले.
दहशतवाद्यांना प्रथम शरण येण्याचे आवाहन करण्यात आले. ते आवाहन झुगारून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. त्यामध्ये 3 दहशतवादी मारले गेले. ते हिज्बुल मुजाहिदीन या संघटनेचे सदस्य होते. चकमकीत एक लष्करी जवान शहीद झाला.
याआधी शुक्रवारी दक्षिण काश्मीरच्या शोपियॉं जिल्ह्यात चकमक झडली. त्यामध्ये 4 दहशतवादी ठार झाले. त्याशिवाय, एक दहशतवादी शरण आला. चालू वर्षात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधातील मोहिमा तीव्र केल्या आहेत.
त्यामध्ये आतापर्यंत मोठ्या संख्येने दहशतवादी मारले गेले. त्यात काही म्होरक्यांचाही समावेश असल्याने दहशतवादी संघटनांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे.