देवेंद्र फडणवीस; नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सशक्त भारताची निर्मिती
फलटण – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सशक्त भारताची निर्मिती होत आहे. मोदींचे नेतृत्व वैश्विक होत असून तिरंग्याची शान वाढविणारे व भारत एकसंध करण्याचे काम होत आहे. आगामी काळात ‘दुष्काळमुक्त’ महाराष्ट्र घडवण्याचे आमचे ध्येय असून त्यासाठी महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे रहा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
फलटण येथे गुरुवारी झालेल्या महाजनादेश संकल्प सभेत ते बोलत होते. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, फलटण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार दिगंबर आगवणे, माजी आमदार जयकुमार गोरे, विश्वासराव भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, ऍड. नरसिंह निकम, जयश्री आगवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री म्हणाले, फलटणकरांनी लोकसभा निवडणुकीत खा. रणजितसिंहांच्या माध्यमातून एक इंजिन भाजपला जनतेने दिल्यावर विकासकामांची रेल्वे किती जोरात धावतेय, हे अनुभवले आहे. आता त्याच्या जोडीला आमदारकीच्या माध्यमातून दुसरं इंजिन दिल्यास विकासाची गाडी किती जोरात धावेल, याचा विचार करा. जनतेने 24 तारखेला फलटणचा आमदार आमच्या झोळीत टाकावा. फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे नीरा-देवघरचे पाणी आमच्या सरकारने पुन्हा मिळवून दिले. वर्षानुवर्षे रखडलेली रेल्वे प्रत्यक्षात धावायला लागली, नाईकबोंबवाडी येथील नवीन एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावला.
साखरवाडी येथील न्यू फलटण शुगर वर्क्सचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील राहील. आम्ही सत्तेत असताना फक्त विकासांवर मते मागत आहोत. महाराष्ट्र आणखी गतिमान करण्यासाठी पुन्हा सत्ता द्या. 2022 पर्यंत प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर देऊ. विठ्ठलाच्या दर्शनाला जाण्यासाठी रेल्वे असावी, हे वारकरी मंडळींचे स्वप्न पूर्ण करू. आचारसंहितेमुळे मर्यादा आहेत. आचारसंहिता संपताच तुमची कामे शंभर टक्के पूर्ण करू.
जयकुमार गोरे म्हणाले, फलटण विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडविण्याचा चंग जनतेने बाधला आहे. रामराजेंनी फलटण, खंडाळा, माळशिरस या तालुक्यांचे हक्काचे पाणी बारामतीकरांना दिले होते. ते पाणी परत या तालुक्यांना मिळवून देण्याचे काम फक्त मुख्यमंत्रीच करू शकतात.
खा. रणजितसिंह म्हणाले, लोकसभा निवडणुकीत जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता मुख्यमंत्रांच्या मदतीने 90 दिवसांत केली.
दिगंबर आगवणे यांची मूर्ती लहान असली तरी गोरगरिबांना मदत करणारा हा नेताच फलटणचा आमदार व्हायच्या योग्यतेचा आहे. काम करणारा आमदार पाहिजे की, त्यांच्या घरी काम करणारा घरगडी पाहिजे, हे जनतेने ठरवावे. जो बारामतीचा झाला नाही तो भाजपचा कधीच होऊ शकत नाही. फलटण दहशतीखाली आहे. त्यांनी फलटणचा बिहार बनवला आहे.