इस्लामाबाद -भारतीय लष्कराने दिलेल्या प्रत्युत्तरात एक पाकिस्तानी सैनिक ठार झाला. त्याशिवाय, दोन पाकिस्तानी महिलाही जखमी झाल्या. ती घटना नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत घडली.
पाकिस्तानी सैनिक वारंवार शस्त्रसंधीचा भंग करून एलओसीलगत भारतीय हद्दीत मारा करतात. त्या माऱ्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याचे धोरण भारतीय सुरक्षा दलांनी अवलंबले आहे. गुरूवारी घडलेल्या तशाप्रकारच्या घटनेत भारतीय लष्कराने पाकिस्तानी आगळिकीला चोख प्रत्युत्तर दिले. त्यात झालेल्या हानीची माहिती पाकिस्तानकडूनच देण्यात आली.
अर्थात, नेहमीप्रमाणे पाकिस्तानने भारतीय जवानांनीच आधी मारा केल्याचा कांगावा केला. जम्मू-काश्मीरबाबत भारताने उचललेल्या धडक पाऊलामुळे पाकिस्तान बिथरला आहे. त्यातून भारतविरोधी कारवाया वाढवण्यासाठी तो देश प्रयत्नशील आहे. शस्त्रसंधी भंगाच्या कुरापती त्याचाच भाग आहेत.