Giriraj Singh : संसदेच्या सुरक्षेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याची मागणी विरोधकांकडून सातत्याने होत आहे. याबाबत केंद्रीय मंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते गिरिराज सिंह यांनी वेळ येऊ द्या, ते प्रत्येक गोष्टीचे उत्तर देतील, असे म्हटले आहे. विरोधकांना संसद गहाण ठेवायची आहे.
संसदेच्या सुरक्षेबाबत विरोधकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत पंतप्रधानांनी संसदेत उपस्थित राहून यावर भाष्य करण्याची मागणी करत आहेत. त्यांच्या या मागणीवर केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह यांनी, “तुकडे तुकडे टोळी गृहमंत्र्यांकडे जाब विचारत आहे. तपास पूर्ण होऊ द्या, तुकडे तुकडे टोळीला चोख उत्तर मिळेल.”असे सडेतोड उत्तर दिले आहे.
दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन यांनी‘पंतप्रधान मोदी हे सभागृह नेते आहेत. त्यांनी येथे येऊन सुरक्षेतील त्रुटींबाबत निवेदन द्यावे. पण आता आपण म्हणू शकतो की ‘मोदी है तो मुश्किल है…’. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सभागृहात येऊन निवेदन दिले, पण त्यांनी आधी आम्हाला एकदा बोलावायला हवे होते. हिवाळी अधिवेशनापूर्वी दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांना सावध राहण्याचा सल्ला दिला होता, असे काँग्रेस खासदार म्हणाले.
पुढे त्यांनी विचारले, पंतप्रधानांनी अद्याप काही वक्तव्य केले आहे का? गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधानांना संसदेच्या कामकाजाचे आचरण समजून सांगावे द्यावे. सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून विरोधकांनी सभागृहात सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींचा मुद्दा उपस्थित केला आहे. 13 डिसेंबर रोजी संसद भवनात घुसखोरी झाली होती, त्यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले होते. मात्र, गुरुवारपासून (14 डिसेंबर) सभागृहात विरोधकांकडून या मुद्द्यावरून सातत्याने घोषणाबाजी सुरू आहे.