बबनराव पाचपुतेंचा कार्यकर्त्यांना आदेर्शें
पाचपुते 3 ला उमेदवारी अर्ज भरणार
भाजपची उमेदवारी आपल्याला मिळणार हे निश्चित आहे. 3 ऑक्टोबरला शक्तीप्रदर्शन करून बबनराव पाचपुते यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. सर्व कार्यकर्त्यांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी भगवानराव पाचपुते यांनी केले.
श्रीगोंदा – 2014 ला पराभव झाला, पण घरी बसलो नाही. जनतेच्या सुख-दुःखात अहोरात्र पळत आहे. गेली पाच वर्षे काम करून तालुक्यातील महत्वपूर्ण प्रश्न मार्गी लावले. काही जण माझ्यावर टीका करतात पण त्यांच्यावर टीका करून मला कोणाला मोठे करायचे नाही. विधानसभेसाठी भाजपचे तिकीट आपल्यालाच असून कार्यकर्त्यांनी कामाला लागा असा आदेश माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी काष्टी येथील कार्यकर्त्यांच्या नियोजन बैठकीत दिला.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते भगवानराव पाचपुते होते. पाचपुते पुढे म्हणाले, आपले तालुक्यात तीनवेळा दौरे झाले. मग विरोधक अजुन कुठेच पोहचले नाही. मागील निवडणुकीत पैशाने आपला घात झाला. पण आता पैसा चालणार नाही. कोण कामाचा माणूस आहे यालाच जनता स्विकारणार आहे. पाण्याअभावी शेतकरी होरपळला आहे. आज ऊस नसल्याने साखर कारखाने बंद ठेवण्याची वेळ कोणामुळे आली याचा विचार जनता नक्कीच करेल.
भगवानराव पाचपुते म्हणाले, तालुक्याचे नेतृत्व पाच वर्षे चुकीच्या माणसाकडे गेल्यामुळे पाणीप्रश्नावर तालुक्याच वाटोळ झाले.सामान्य शेतकऱ्यांचा संसार उध्वस्त झाला, म्हणून आता झालेली हिच चुक सुधारण्यासाठी पुन्हा बबनराव पाचपुते यांना तालुक्याचे लोकप्रतिनिधी करण्यासाठी पुकारलेल्या एल्गारात सर्वांनी सहभागी व्हावे. यावेळी जिल्हा फेडरेशनचे उपाध्यक्ष अनिल पाचपुते, जिल्हा परिषद सदस्य सदाशिव पाचपुते, नागवडे दुध संघाचे माजी अध्यक्ष माणिकराव पाचपुते, विठ्ठलराव काकडे, दिलीप चौधरी, बाळासाहेब राहिंज, शिवाजीराव पाचपुते, बंडू जगताप, डॉ. बाळासाहेब पवार, बाजार समितीचे उपसभापती वैभव पाचपुते, रफिक इनामदार, ज्ञानदेव गवते यांच्या सह मान्यवर हजर होते.