पुणे – राज्यातील आदिवासी भागातील शाळामधील दारिद्रय रेषेखालील मुलींचे शाळेतील उपस्थितींचे प्रमाण वाढविण्यासाठी मुलींना प्रतिदिन एक रुपया याप्रमाणे उपस्थिती भत्ता अदा करण्यात येतो. योजना सुरू झाल्यापासून या भत्त्यात वाढ झालेली नाही. या भत्त्यात वाढ करावी; अन्यथा ही योजना बंद करून नवीन योजना सुरू करावी, अशी शिफारस प्राथमिक शिक्षण विभागाकडून राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे करण्यात आलेली आहे.
या याजनेमुळे मुलींच्या उपस्थितीमध्ये वाढ झाली आहे. पात्र, मुलींनाच हा भत्ता देण्यात येतो. काही अपवादात्मक परिस्थितीत लाभार्थी मुली कमी झाल्यामुळे योजनेवरील खर्चही कमी होतो. योजनेचा शुभारंभ झाल्यापासून आजतागायत या उपस्थिती भत्त्यात काहीच वाढ करण्यात आलेली नाही. आजच्या वाढत्या महागाईच्या काळात एक रुपयाला फार महत्त्व राहिलेले नाही. उपस्थिती भत्त्यात वाढ करावी यासाठी विविध संघटना, पालक, शाळा यांच्याकडून शासनाकडे अनेकदा मागणीही करण्यात आलेली आहे. मात्र शासनाकडून त्यावर अद्यापही सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही.
उपस्थिती भत्ता अदा करण्याची योजना बंद करून इतर काही विकासात्मक योजना राबविण्याबाबतचे नियोजन करणे आवश्यक बनू लागले आहे. मात्र, यासाठीच्या योजनांसाठी जादा निधीची तरतूद करावी लागणार आहे हे स्पष्टच आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.