आळेफाटा – शेतकऱ्यांच्या दूधाला कमीत कमी 30 रुपये प्रति लिटर भाव जाहीर करावा. तसेच पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये जनावरांना वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार मिळावेत, यासाठी पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांना माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्र लिहले आहे.
राज्यासह संपूर्ण देशभरात करोनामुळे लॉकडाऊन असताना या गंभीर परिस्थितीमध्ये जीवनावश्यक सेवा पुरविणाऱ्या शेतकऱ्यांच्या दुधाला खासगी दूध संस्था व दूध डेअरीला 20 ते 22 रूपये प्रतिलिटर इतका कमी भाव मिळत आहे. या रकमेतून मुलभूत खर्चही भागविणे शेतकऱ्यांना अडचणीचे झाले आहे. राज्यात लॉकडाऊन होण्याआधी शेतकऱ्यांच्या दूधाला साधारणत: 30 ते 32 रूपये भाव मिळत होता.
मात्र ग्राहकांना आजही पुर्वीच्याच दरानुसार दूध दिले जात आहे. एकंदरीत शेतकऱ्यांना प्रति लीटर 10 ते 12 रूपये नुकसान सोसावे लागत आहे. त्यातच पशुखाद्याच्या किंमती वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात अडकत आहे. यावर शासनाने तातडीने योग्य उपाय योजना करून शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे.
जनावरांना उपचार मिळणे कठीण
याशिवाय पशुवैद्यकीय दवाखान्यांमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांना करोनामधील अत्यावश्यक कामांकरिता अन्य नेमणूक दिल्याने पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये केवळ शिपाई हजर असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे. त्यामुळे या दवाखान्यांत जनावरांवर उपचार मिळणे कठीण झाले आहे. जनावरे आजारी पडल्यास शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये हजर असणे आवश्यक आहे.