फुरसुंगी, उरुळी देवाची ग्रामस्थांच्या आंदोलनात महानगरपालिकेला अपयश
– महादेव जाधव
फुरसुंगी – शहरात कोरोनाचे संकट गडद झाले असताना गेल्या 20 दिवसांपासून कचराडेपोवर ग्रामस्थांनी ओपन डंपिंग विरोधात आंदोलन सुरू केले आहे. तर ओपन डंपिंग होत नसल्याचा दावा पालिका अधिकारी करीत आहेत. दोघांचीही परस्परविरोधी भूमिका असली तरी करोनाच्या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छ ठवणे गरजेचे आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करीत पालिका अधिकारी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने कचऱ्याचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. यातून शहर व उपनगरांमध्ये कचऱ्याचे ढिग वाढू लागले आहेत. कचरा प्रक्रिया प्रकल्पांच्या कामाची तसेच संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येऊन कचरा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे गेल्या 27 वर्षांपासून पुणे शहराच्या कचऱ्याची समस्या सुटलेली नाही. ऊरुळी देवाची, फुरसुंगीचे ग्रामस्थ कचऱ्याच्या समस्येविरोधात गेल्या 10 ते 15 वर्षांपासून लढा देत असताना पालिकेने ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर नेहमीच वेळकाढूपणा केला आहे. आंदोलनानंतर पालिका प्रशासन ढिम्म पडत आहे. कचरा प्रक्रिया प्रकल्पांवर कोणाचेही नियंत्रण नाही, ओपन डंपिंग होऊनही कोणतीही कारवाई होत नसल्याने ही समस्या कायम आहे.
राष्ट्रीय हरीत लवादाने फुरसुंगी-उरुळी देवाची येथील कचरा डेपोवर कोणत्याही प्रकारचा कचरा ओपन डंपिंग करण्यास बंदी घातली आहे. बंदी असूनही पालिकेकडून ओपन डंपिंग होत असल्याचे निदर्शनास येताच ग्रामस्थांनी गेल्या 24 तारखेपासून ओपन डंपिंग बंद आंदोलन सुरू केले आहे. न्यायालयाचाच आदेश असल्याने पोलीस प्रशासनाचा धाक दाखवून पालिकेला आंदोलन दडपताही येईना, त्यातच सध्या पुणे शहरावर करोनाचे संकट गडद झाले असून यातून मार्ग काढण्यासाठी पालिकेने तातडीने ठोस उपाययोजना करुन कचराडेपोची समस्या मार्गी लावणे गरजेचे आहे. करोना बरोबरच इतर रोगांच्याही साथी सुरु होऊन परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही. यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाने हा प्रश्न गांभिर्याने हाताळणे गरजेचे ठरत आहे.
पुणे महानगरपालिकेच्या फुरसुंगी-ऊरुळी देवाची येथील कचरा डेपो बंद करण्याबाबत प्रत्येक वेळी झालेल्या आंदोलनावेळी तोडगा काढण्यासाठी ओपन डंपिंग बंद करुन कचरा डेपो बंद करणे, शहरातील चारही दिशांना कचरा डेपोचे विभाजन करणे, पाणीयोजना, कॅपिंग, बायोमायनिंग, कचराडेपो बाधित मुलांच्या नोकरीचा प्रश्न सोडविणार, दोन्ही गावांतील विकासकामे प्राधान्याने पूर्ण करणार, जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण करणार आदी आश्वासने देऊन कचऱ्याचा प्रश्न पुढे ढकलला जातो. त्यानंतर काही दिवसांत ही सर्व आश्वासने हवेत विरून जातात.
अनेक आजारांची लागण…
पुणे महापालिकेच्या फुरसुंगी-ऊरुळी देवाची कचरा डेपोत गेल्या 27 वर्षांपासून लाखो टन कचरा उघड्या माळरान जमिनीवर अशास्त्रीय पध्दतीने टाकल्याने येथील नागरिकांना जीवघेण्या नरकयातना सोसाव्या लागत आहेत. नागरी घनकचरा नियम 2000 नुसार उघड्या जमिनीवर कचरा साचविणे गुन्हा असून यातून जीवघेणी दुर्गंधी आणि त्यातून परिसरात रोगराई फैलावत आहे. या परिसरात सतत काविळ, थंडीताप, जुलाब, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया रोगांच्या साथींची लागण सुरू असते.
…तरच कचराकोंडी फुटेल
पालिका प्रशासनाने कचऱ्याची समस्या आणखी गंभीर होण्याअगोदरच कडक उपाययोजना करून कचरा वर्गीकरण, सोसायट्यांचा सोसायट्यांमध्ये जिरवणे, छोटे-छोटे कचरा प्रक्रिया प्रकल्प प्रत्येक प्रभागात उभारुन प्रभागातील कचरा प्रभागातच जिरवल्यास कचरा समस्या सुटण्यास मदत होईल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्लॅस्टिक बंदीची काटेकोर अंलबजावणी केल्यास कचऱ्याची समस्या कायमची सुटेल. तसेच, केवळ फुरसुंगी-उरुळीवरच अवलंबून न राहता शहराच्या इतर भागात कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणे गरजेचे आहे. तरच कचराकोंडी फुटेल.