हॉटेल व्यवसायाला सर्वाधिक झळ
लोणावळा – पर्यटननगरी लोणावळा शहरातील पर्यटन व्यवसायाने करोना विषाणूचा धसका घेतला आहे. येथील हॉटेल व्यवसायाला त्याचे चटके बसू लागले आहेत. गेल्या काही दिवसांत या व्यवसायात 70 ते 80 टक्क्यांपर्यंत घसरण झाली. अनेक हॉटेल आणि रिसॉर्ट ओस पडू लागली आहेत. पुढील काही दिवसांत या विषाणूचा फैलाव असाच वाढत राहिला, तर मात्र येथील पर्यटन आणि पर्यटनावर अवलंबून असलेले व्यवसाय मेटाकुटीला येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लोणावळा शहर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून जगप्रसिद्ध आहे. याठिकाणी पर्यटनासाठी किल्ले, लेण्यांसारखी अनेक ऐतिहासिक ठिकाण, अनेक धरणं आहेत. याशिवाय कैवल्यधाम सारख्या जगप्रसिद्ध संस्था आहेत. त्या सर्वांना भेटी देण्यासाठी दरवर्षी लोणावळ्यात मोठ्या संख्येने देशी-विदेशी पर्यटक येत असतात. त्यामुळे लोणावळा शहरात पर्यटन आणि त्यावर आधारित व्यवसायाची एक मोठी इंडस्ट्री काम करते, असे म्हटलं तरी वावग ठरणार नाही. मात्र मागील काही दिवसांपासून उत्पन्न झालेल्या करोना या संसर्गजन्य रोगामुळे या इंडस्ट्रीला मोठा फटका बसत आहे. करोना विषाणूचा संपूर्ण जगाने धसका घेतला आहे. संसर्ग होण्याच्या भीतीने लोक घराबाहेर पडेनासे झाले आहे. त्याचा परिणाम अन्य व्यवसायांप्रमाणे पर्यटन व्यवसायावर देखील झाला आहे.
लोणावळा शहरात हॉटेल इंडस्ट्री ही खूप मोठी आहे. शेकडोंच्या संख्येने याठिकाणी छोटी-मोठी हॉटेल्स, रिसॉर्ट असून, हजारो लोक याठिकाणी काम करतात. मात्र करोना विषाणूचा धसका पर्यटकांनी घेतला आहे. जवळपास सर्वच हॉटेलच्या व्यवसायावर याचा 70 ते 80 टक्के परिणाम झाला आहे. अनेक हॉटेल्स ओस पडू लागले आहेत. किंबहुना हॉटेल्स तसेच रिसॉर्टमध्ये रूमच्या चौकशीसाठी तसेच ऍडव्हान्स बुकिंगसाठी येणारे फोन कॉल देखील जवळजवळ बंद झाले आहे. यामुळे येथील हॉटेल व्यावसायिकांचे तसेच त्यावर अवलंबून असलेल्या इतर छोट्या-मोठ्या उद्योगांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. आणि हीच परिस्थिती कायम राहिल्यास हा व्यवसाय डबघाईला जाण्याची चिन्ह निर्माण झाले आहे.
करोनाच्या खबरदारीसाठी गावपातळीवर बैठका
पवनानगर – करोनाविषयी गावपातळीवर उपायोजना करण्यासाठी उर्से ग्रामपंचातीमध्ये बैठक घेण्यात आली. त्यामध्ये उर्से परिसरातील आठ कंपन्याचे अधिकारीही सहभागी झाले होते. सरपंच कांचन धामणकर व उपसरपंच प्रदीप धामणकर यांनी तातडीची मिटिंग बोलाविली होती. या वेळी अंगणवाडी सेविका, प्राथमिक व माध्यामिक शिक्षक शाळेचे शिक्षक, डॉक्टर, फिनोलेक्स प्लासान, जयहिंद फोर्स मोटार्स, फिनोलेक्स पाईप, महिंद्रा सीआय, फिनोलेक्स केबल, सुप्रिम इंडस्ट्रिज, बीडब्लयूएफ इंडिया आदी कंपन्याचे अधिकारी उपस्थित होते. सॅनिटायझर, मास्क यांचा वापर करावा सर्व ग्रामस्थांना मास्क वाटप करणार, असे सर्व कंपन्यांच्या अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले. अशा प्रकारच्या बैठक सर्व महाराष्ट्रामधील ग्रामपंचायतीने बोलवाव्या व या रोगापासून बचावाचे खबरदारी म्हणून प्राथमिक उपाय करावे, असे आवाहन उपसरपंच प्रदीप धामणकर यांनी केले.