पैसा हे सर्वस्व नसतं,
माणसं उभी करणं महत्त्वाचं असतं, उभी केलेली माणसंच आयुष्यभर साथ देतात, अशी माणसं उभी करताना सचोटीची वाट कधीच सोडू नको, हीच शिकवण भाऊंनी आपल्या आचरणातून आमच्यावर बिंबवली!
– गणेश दिलीप मुरकुटे
पैशांची किमत तो जवळ असतानाच केली पाहिजे! पैसा खर्च करण्याची शिस्त अंगी बाणवली तर शुन्यातूनही विश्व निर्माण होऊ शकते; केवळ 900 रुपयांच्या भांडवलावर “बाणेर नागरी सहकारी पतसंस्थे’ची उभारणी करताना भाऊंनी हाच आदर्श आम्हाला घालून दिला. अर्थकारणातून समाजकारण साधणारा वारसा आपल्या मुलांनी पुढे चालवावा हीच त्यांची इच्छा असल्याचे गणेश सांगतो.
बाणेर ग्रामपंचायतीत काम करत असताना भाऊ गोरगरिबांना अडीअडचणीत मदत करत. सामान्य लोकांची आर्थिक अडचण सहजासहजी दूर व्हावी यासाठी त्यांनी 20-22 वर्षांपूर्वी बाणेर पतसंस्थेची स्थापना केली. आज सहकारी बॅंका, पतसंस्था डबघाईला आल्या आहेत. कधीकाळी सर्वसामान्यांना आपल्या वाटणाऱ्या या संस्था आज संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत; परंतु बाणेर पतसंस्थेने आपली विश्वासार्हता जपली आहे; ती भाऊंच्या सचोटीने कारभार करण्याच्या पद्धतीमुळेच!
पतसंस्थेची निव्वळ आर्थिक पत सुधारण्यावर भाऊंनी भर दिला, असे नाही तर तिचा नावलौकिक कसा वाढेल याकडेही लक्ष पुरविले. संस्थेच्या कामाची दखल घेत तिला विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. आजवर संस्थेला 117 पुरस्कार मिळाले असून त्यात विदेशी पुरस्काराचाही समावेश आहे. एकार्थी गावपातळीवर उदयास आलेली पतसंस्था विदेशातही गाजली. त्याचे सर्व श्रेय निश्चितच भाऊंना आहे.
बॅंकिंग क्षेत्रातील कोणतेही औपचारिक शिक्षण न घेता, इतकेच कशाला शालेय शिक्षणही फारसे झाले नसताना भाऊंनी स्वत:च्या व्यवहारज्ञानाने पतसंस्थेचा कारभार ज्या पद्धतीने सांभाळला आहे. ती आम्हा मुलांसाठी कौतुकाची गोष्ट आहे.
कायद्यानेच कायद्याची लढाई लढली पाहिजे, हे त्यांचे तत्त्व! बॅंकिंग क्षेत्रातील सर्व खाचाखोचा शिकून घेतल्यानंतर त्यांनी त्यातील कायद्याचे ज्ञानही आत्मसात केले आहे. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर माझ्या पत्नीलाही त्यांनी कायद्याचे शिक्षण घ्यायला लावले. आज तीही त्यांना या कामात मदत करत आहे. माझ्या दृष्टीने तर ही अभिमानाची बाब आहे.
सर्वच राजकीय पक्षांशी भाऊंचे चांगले संबंध असले तरी राजकारणापासून अलिप्त राहून समाजकारण करण्याचा नियम त्यांनी पाळला आहे. आदर्श माता पुरस्कार, वृक्षारोपण अशा अनेक कार्यांतून सामाजिक बांधिलकी जपली. सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेला दरवर्षी दिवाळी फराळाचे वाटप करण्यात येते. त्यातही ते उत्साहाने सहभागी होतात. सिंधुताईंच्या चित्रपटासाठीही त्यांनी आर्थिक मदत केली होती. या क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना “डॉक्टरेट’ प्रदान करण्यात आली. सर्वांना सांभाळून घेणे, आपले मानून मदत करणे ही भाऊंच्या जगण्याची सवय बनली आहे. त्यांच्या कार्याचा वारसा त्यांच्याप्रमाणेच सचोटीने पुढे चालविणे ही आम्हा मुलांची खरी जबाबदारी आहे!