भारत देसडला
लहानपणी झालेली मूल्य संस्कारांची पेरणीच आपल्याला आयुष्यभर चांगलं काम करण्याची प्रेरणा देऊन जाते! बोलण्यातून होणाऱ्या संस्कारांपेक्षा कृतीतून होणारे संस्कारच अधिक महत्त्वाचे असतात. वडिलांनी दिलेली संस्कारांची शिदोरी घेऊन आयुष्यात यशाची शिखरे गाठत राहिलो…! पण माझे हे यश मला नेहमीच अपूर्ण वाटत राहिले. कारण त्याचे साक्षीदार होण्यासाठी, पाठीवर कौतुकाची थाप द्यायला वडील हयात नव्हते. वडिलांच्या जाण्याने दु:खाची किनार त्या यशाला कायम राहिली… मात्र वडिलांनी केलेले संस्कारच आज आमच्या जगण्याची ताकद असल्याचे सांगत भारत देसडला यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली….!
वडील कडक शिस्तीचे; पण तेवढेच मायाळूही होते. ते ऑईल इंजिन दुरुस्तीचे काम करायचे! गरीब परिस्थितीमुळे एका खोलीतच दोन भाऊ व तीन बहिणी असा मोठा परिवार राहात होता. वडिलांच्या रोजच्या कमाईवरच घर चालायचे. एक रुपयादेखील मोठा वाटायचा! पैशांची नसली तरी त्यांच्याकडे मनाची श्रीमंती खूप होती… सर्वांचे आपुलकीने, मायेने स्वागत करत. मला आठवते, त्या काळीही बाहेरचा एक तरी माणूस रोज आमच्या घरी जेवायला असे!
वडिलांनी प्रामाणिकपणाचा, नेहमी खरं बोलण्याचा आणि पारदर्शक व्यवहाराचा संस्कार आपल्या कृतीतून आमच्यामध्ये रुजविला होता. 1968-69ची गोष्ट असेल! वाणी, दूधवाला आणि इतरांनी महिन्याची उधारी एकदम देण्याची मुभा दिली होती. एकदा त्यांचे हिशेब पूर्ण करण्यासाठी 350 रुपये वडिलांनी माझ्याकडे दिले. पैसे दिल्यानंतर सर्वांकडून रोख मिळाले’ असे लिहून आणायला सांगितले. त्यांनी सांगितलेले काम मी पार पाडले होते. परंतु अनावधानाने किंवा माहीत नाही कसे पण ती सर्व रक्कम माझ्याकडेच राहिली होती.
वडिलांना ही गोष्ट समजल्यानंतर ते म्हणाले, भाऊ तुझे काम वाढले आहे. पैसे द्यायला तुला त्या सर्वांकडे पुन्हा जावे लागेल!’ त्यांनी सांगितल्याप्रमाणे लगोलग मी ते काम पूर्ण केले. खरंतर वडिलांनी ते पैसे तसेच ठेवून घेतले असते तर काहीच बिघडले नसते. पण त्यामुळे माझा गैरसमज झाला असता. चुकीचा संदेश मला जाऊ नये यासाठी त्यांनी ते पैसे परत करायला लावले होते. वडिलांची ही शिकवण माझ्या मनावर कायम कोरली गेली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या मोहापासून ही शिकवण मला आजही परावृत्त करते.
प्रचंड कष्ट करण्याची आणि कोणत्याही परिस्थितीवर हसतखेळत मात करण्याची त्यांची वृत्ती होती. माणसे जोडून ठेवण्याची त्यांची कला; सरहद्द’, श्यामची आई फाउंडेशन’ किंवा अनेक धर्मादाय संस्थांचे काम करत असताना मला उपयोगी पडत असते. वडिलांना वाचण्याची आवड होती. त्यांच्यामुळेच मराठी साहित्याची गोडी निर्माण झाली. त्यातूनच पुढे साहित्य क्षेत्राशी जोडलो गेलो. पंजाबमधील घुमान येथे 2015 मध्ये पार पडलेल्या 88 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पद मी भूषविले.
संमेलन व्यवस्थित पार पडावे; यासाठी वारंवार घुमानला भेट देऊन मी व्यवस्था मार्गी लावली होती. माझ्यासारख्या एका सर्वसामान्य घरातून आलेल्या व्यक्तीला हा बहुमान मिळणे, ही घटना माझ्या आयुष्यात मैलाचा दगड ठरली आहे. आपल्या कामात गुणवत्ता राखत. सातत्याने चांगले काम केले तर यश निश्चित मिळते, या त्यांच्या शिकवणीमुळेच मोहोर क्रिएशन्स’च्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रात मी प्रगती करू शकलो.
परिस्थितीशी झगडत राहणारे, दिलदार वृत्तीने संकटांना सामोरे जाणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. कॅन्सरसारख्या दुर्धर आजारालाही त्यांनी धैर्याने तोंड दिले होते. हलाखीची परिस्थिती असतानाही त्याची झळ आम्हा मुलांना त्यांनी कधी पोहोचू दिली नाही. उलटपक्षी मी मोठा असल्याने माझे तर खूप लाड झाले. आपले कष्ट मुलांच्या वाट्याला येऊ नयेत असे इतरांप्रमाणे त्यांनाही वाटे. आज मला मिळालेले यश पाहण्यासाठी ते हयात नाहीत. याची खंत मनात कायम राहणार आहे. पण वरतून ते हे सर्व पाहात असतील. किंबहुना त्यांच्या आशीर्वादानेच ही प्रगती करणे शक्य झाल्याचा विश्वास मला वाटतो. म्हणतात ना….
पिता नन्हें से परिंदे का आसमान हैं, पिता है तो बच्चों के सारे सपने हैं।