या वर्षातील पहिले सूर्यग्रहण आज पाहायला मिळणार आहे. या दिवशी ज्येष्ठ आमावस्या आहे. आज 21 जून रोजी सकाळच्या वेळात हे ग्रहण असणार आहे. या ग्रहणाच्या आधी व नंतर येत असलेल्या पौर्णिमेला दोन चंद्रग्रहण होणार आहेत.
चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची कक्षा पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या कक्षेशी सुमारे पाच अंशाचा कोन करते. म्हणजे ती थोडी तिरपी आहे. जर या दोन्ही कक्षांची प्रतलं आहेत असं मानलं, तर चंद्राचे कक्षाप्रतल पृथ्वीच्या कक्ष प्रतलाला दोन ठिकाणी छेदते. या दोन छेदनबिंदूंनाच “राहू’ आणि “केतू’ असं म्हणतात. या दोन बिंदूंपाशी ज्यावेळी चंद्र असतो, त्या त्यावेळी ग्रहणं होतात. चंद्र ज्यावेळी पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये असतो, तेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते आणि सूर्यग्रहण होते. याउलट चंद्र व सूर्य यांच्यामध्ये पृथ्वी असते तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण होते. जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत तसेच एकाच प्रतलात येतात. त्यामुळे चंद्राची गडद सावली पृथ्वीवर पडते. नंतर पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्यामुळे ही सावली जमिनीवरून प्रवास करते. या प्रवासात येणाऱ्या भागांवर कंकणाकृती सूर्यग्रहण तयार होते. ही सावली गोलाकार स्वरूपाची असल्याने त्याला “कंकणाकृती सूर्यग्रहण’ म्हणतात. यामुळे काही काळ सूर्य नाहीसा होतो.
सूर्यग्रहणाचे मुख्यत्वे एकूण तीन मुख्य प्रकार पाहायला मिळतात
1) खंडग्रास, 2) कंकणाकृती, 3) खग्रास
कंकणाकृती सूर्यग्रहण दरवर्षी दिसत नाही. नियमित दिसणाऱ्या खग्रास ग्रहणावेळी पृथ्वी आणि चंद्रातील अंतर सरासरीपेक्षा कमी असते. त्यामुळे चंद्र, सूर्याचे बिंब सारखेच दिसते. म्हणून सूर्यबिंब हे चंद्रबिंबाने झाकले जाते; परंतु कंकणाकृती ग्रहणावेळी चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर जास्त असते. तेव्हा सूर्यबिंबापेक्षा चंद्रबिंब लहान दिसते. यामुळे सूर्यबिंब पूर्ण झाकले जात नाही आणि कंकणासारखी प्रकाशाची कडा दिसते, त्याला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात. सूर्याचा व्यास चंद्राच्या व्यासाच्या 400 पट आहे. पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर हे चंद्रापासूनच्या 400 पट आहे. त्यामुळे चंद्र सूर्याचे आकार सारखेच दिसतात. परिणामी, खग्रास सूर्यग्रहणात काही क्षण सूर्यबिंब दिसत नाही.
हे कंकणाकृती सूर्यग्रहण मध्य आफ्रिकन रिपब्लिक, कांगो आणि इथिओपियासह आफ्रिकेच्या काही भागांतून पाकिस्तानच्या दक्षिणेस आणि उत्तर भारतासह चीनलाही दिसू शकेल. ओमान व भारतात केवळ सहा महिन्यात दोन कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची संधी मिळाली आहे. उत्तर भारतात राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेशच्या उत्तरेकडील भाग व उत्तरांचल या प्रदेशात काही ठिकाणी हे सूर्यग्रहण कंकणाकृती स्वरूपात दिसणार आहे. देशभरातील महाराष्ट्रासह इतर सर्व राज्यांमध्ये हे सूर्यग्रहण खंडग्रास स्वरूपाने दिसणार आहे.
सारोस साखळी क्रमांक 137 मधील हे ग्रहण असून, यंदाच्या या वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणाचा कालावधी तब्बल 5 तास 48 मिनिटे आणि 3 सेकंद असणार आहे. यावेळी भारतातील कंकणाकृती स्थिती 33 ते 28 सेकंद दरम्यान असणार आहे. 26 डिसेंबर 2019 रोजी दक्षिण भारतातून दिसलेल्या कंकणाकृती सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती जवळपास 210 सेकंद होती म्हणजे यावेळी खूप कमी कालावधीसाठी कंकणाकृती स्थिती अनुभवता येणार आहे. या सूर्यग्रहणानंतर साधारण 2034 सालापर्यंत खग्रास किंवा कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही.
महाराष्ट्रात हे सूर्यग्रहण कंकणाकृती न दिसता खंडग्रास अवस्थेत दिसणार आहे. सकाळी साधारण दहा वाजता हे ग्रहण सुरू होईल व दुपारी दीडच्या दरम्यान ग्रहण मोक्ष पाहायला मिळेल. पुढे महाराष्ट्रातील प्रमुख शहरात ग्रहण स्पर्श, मध्य, मोक्ष व ग्रहण कालावधी संदर्भात माहिती दिली आहे.
सुरक्षितपणे ग्रहण कसे पाहाल?
नुसत्या उघड्या डोळ्यांनी सूर्याकडे अजिबात पाहता कामा नये. कायमचा आंधळेपणा येण्याची शक्यता असते. आपण भिंगानं सूर्याची छोटी प्रतिमा घेऊन कागद, कापूस जाळायचे खेळ केलेले आठवा. आपल्या डोळ्यांतही भिंग असतं आणि सूर्याकडं पाहताना अर्थातच डोळ्यातल्या मागच्या पडद्यावर सूर्याची प्रतिमाच तयार होत असते. सूर्याच्या या प्रतिमेमुळे पडद्याचा तो भाग जळून जाईल! डोळ्यांतल्या पडद्याच्या पेशी एकदा जळून मेल्या की त्या जागी नव्या पेशी तयार होत नाहीत! मोबाइल किंवा कॅमेरा याने सूर्यग्रहणाच्या काळात किंवा इतर वेळीही डायरेक्ट फोटो काढणे आपल्या डोळ्यांसाठी हानिकारक आहे त्यांनासुद्धा सोलर फिल्टर लावणे आवश्यक असते.
सूर्याकडे उघड्या डोळ्याने बघू नका. सूर्यग्रहण सर्वसाधारण “सनग्लासेस’ने पाहणे सुरक्षित नसते. सूर्य आणि सूर्यग्रहण पाहण्यासाठी खास तयार करण्यात आलेले ग्रहण चष्मे वापरा. त्यातून सूर्याकडून येणारी घातक अतिनील किरणे रोखली जातात. सध्या करोनाची परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी आपसात सुरक्षित अंतर ठेवून व ग्रहण चष्मा याचा वापर करून सूर्यग्रहण पाहावे. महाराष्ट्रात साधारण 60 टक्के सूर्यग्रहण दिसणार असल्यामुळे पूर्णपणे अंधार पडेल, पक्षी घरट्याकडे परततील असा प्रकार आपल्याकडे होणार नाही.
एक महत्त्वाची बाब म्हणजे, सूर्यग्रहण ही एक नैसर्गिक घटना आहे. असे असूनही त्याचा संबंध जोडून आपल्या समाजात अनेक अंधश्रद्धा दिसून येतात. त्यांना विज्ञानाचा कोणताही आधार नसतो. सध्याच्या करोनाच्या काळात अनेकांकडून सूर्यग्रहणाचा आणि करोना विषाणूचा संबंध जोडून अतार्किक आणि चुकीची माहिती प्रसारित केली जात असल्याचे समोर आले आहे. वास्तविक, सूर्यग्रहणामुळे अथवा ग्रहणाच्या काळात पृथ्वीवरील वातावरणात विषाणूंची संख्या वाढते असे काहीही दिसून आलेले नाही.
त्यामुळे करोना विषाणू आणि सूर्यग्रहण यांचे परस्परांशी कसलेही नाते नाही. तसेच ग्रहणाच्या काळात काहीही खाऊ नये या समजुतीलाही कोणताच वैज्ञानिक आधार नाही. मी 1980 पासून ग्रहणांचा अभ्यास करत आलो आहे आणि ग्रहणकाळात अन्नपदार्थांचे सेवन करत आलो आहे. सारांश, सूर्यग्रहणच नव्हे तर कोणत्याही ग्रहणाकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहून या नैसर्गिक घटनेचा सुरक्षितपणाने आनंद अनुभवला पाहिजे. (लेखक एमजीएमचे एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ व विज्ञान केंद्र, औरंगाबादचे संचालक आहेत.)
– श्रीनिवास औंधकर, खगोलशास्त्रज्ञ