शेवगाव – केंद्र सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल चार हजार रुपये अनुदान न दिल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी तालुक्यातील आखातवाडे येथे साठवून ठेवलेल्या कापसाच्या ढिगाऱ्यात गाडून घेत गांधीगिरी केली.
शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष शिवराज कापरे यांच्या नेतृत्वाखाली हे अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी अशोक उगले, संजय उगले, विशाल राशीनकर, देवीदास शेळके, राहूल राशीनकर, सोमनाथ सोलाट आदींसह शेतकरी उपस्थित होते.
आज कापसास प्रतिक्विंटल सात हजार ते साडे सात हजार रुपये भाव मिळत आहे. अशा कठीण परिस्थितीत देशाचे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे अनेक वेळा कापसास प्रतिक्विंटल अनुदान देण्यासंदर्भात मागणी केली. परंतु अद्यापी केंद्र सरकारकडून एक रुपयाचे अनुदान मिळालेले नाही. येत्या पंधरा दिवसात आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल चार हजार रुपये अनुदान न दिल्यास सर्व कापूस उत्पादक शेतकरी कापसासह पेटवून घेतील, असा इशारा कापरे यांनी दिला.